प्रतिनिधी /मडगाव
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खड्डेमय रस्त्याची दुरूस्तीचे काम सरकारने हाती घ्यावे, केवळ निवडणूक डोळय़ासमोर ठेऊन नव्हे तर दिर्घकाळ टिकणार याची काळजी घेतली पाहिजे. कुडतरी मतदारसंघातील रस्ते गेली 10 ते 12 वर्षे व्यवस्थित आहे. त्याच प्रमाणे इतर मतदरासंघातील रस्ते व्हायला पाहिजे असे दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
भाजप सरकारला केवळ निवडणुकीच्या तोंडावर खनिज विषय आठवतो. दर निवडणुकीत आश्वासने दिली जातात. मात्र, त्याची पूर्तता करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने आत्ता तरी खनिज व्यवसाय सुरू करावा व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाना दिलासा द्यावा अशी मागणी खा. सार्दिन यांनी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील खनिज व्यवसाय बंद केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर अनेक आरोप केले. पण, हे आरोप ते शेवट पर्यंत सिद्ध करू शकले नाही. पर्रीकर यांनी बंद केलेला खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात भाजपला अपयश आल्याची टीका त्यांनी केली.
खिसे भरणाऱयांना सरकारी नोकऱया देऊ नका
निवडणुकीच्या काळात भाजप सरकारने नोकऱया भरण्याचे सत्र सुरू केले आहे. सरकारी नोकर भरती करताना पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय करू नये, तसेच सरकारातील मंत्र्यांचे खिसे भरणाऱयांना नोकऱया देऊ नये असे खा. सार्दिन यावेळी म्हणाले.
कोविड-19 मुळे ज्यांना मृत्यू आला, त्यांना दोन हजार देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. काही जणांना पैसे मिळाले आहेत. तर मोठय़ा प्रमाणात पैसे न मिळालेली कुटुंबे आहेत. त्यांना सुद्धा हे पैसे मिळाले पाहिजे. कोविडमुळे मृत्यू आलेल्यांना विविध तऱहाचे दाखले सादर करण्यास सांगून त्यांची सरकारने थट्टा करू नये तसेच त्यांना सरकारी खात्यांनी हेलपाटे घालण्यास भाग पाडू नये असे ते म्हणाले.
ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाहे असे केंद्र सरकार व राज्य सरकार खोटे बोलल्याचा आरोपही त्यांनी केला. गोव्यात तर ऑक्सिजन अभावी लोकांचा तडफडून बळी गेलेला आहे. पण, सरकार धडधडीत खोटे बोलत आहे. आत्ता तर पैशांसाठी लोकांना हेलपाटे घालावे लागतात. केंद्र सरकारने 300 कोटी रूपये दिलेले आहेत. त्यातून लोकांना पैसे द्यावे असे खा. सार्दिन म्हणाले.
म्हादई विषयावर बोलताना म्हणाले की, कर्नाटकात निवडणूक असताना मनोहर पर्रीकर यांनी त्यांना थोडे पाणी वळविण्यास मान्यता दिली व त्यानंतर म्हादईचे पाणी कर्नाटकने आपल्याबाजूने वळविले आहे. म्हादईचे पाणी गोव्याला मिळाले नाही तर गोव्यावर मोठे संकट येईल. म्हादईचे पाणी गोव्यालाच मिळाले पाहिजे, त्यासाठी काँग्रेस व समविचारी पक्षाने वेळोवेळी आवाज उठविलेला आहे. आत्ता भाजप सरकार गुंडुराव यांना म्हादईच्या पाण्यासाठी टार्गेट करू पहातात हे अत्यंत चुकीचे आहे. मुळात चुक भाजपने केलेली आहे. त्याचा दोष काँग्रेसला देऊन चालणार नाही. गोव्यातील रेती व्यवसाय अधिकृतरित्या सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. आज बेकायदेशीर रेती व्यवसाय होत असून त्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचारात पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गुंतल्याचा आरोप त्यांनी केला. जर हा भ्रष्टाचार बंद व्हायचा असेल तर कायदेशीर रेती व्यवसाय सुरू होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.