प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठ आणि शहरांतर्गत असलेले रस्ते खराब झाले असून, प्रत्येक रस्त्यावर चरी आणि खड्डे निर्माण झाले आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. अंतर्गत रस्ते मात्र विकासापासून वंचित आहेत. त्यामुळे निर्माण झालेले खड्डे बुजविण्याची कारवाई महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे.
शहरांतर्गत असलेल्या प्रत्येक रस्त्यावर चरी खोदण्यात आल्या आहेत. डेनेज जोडणी, नळ जोडणी आणि विद्युत जोडणीसाठी खोदण्यात आलेल्या या चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. परिणामी वाहनधारकांना या चरी धोकादायक ठरत आहेत. चरी खोदल्यानंतर त्याची व्यवस्थित दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधीत इमारतधारकांची आहे. मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. अशाप्रकारे प्रत्येक रस्त्यावर चरी निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे काही रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्याने व्यावसायिक आणि बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. शहरांतर्गत रस्त्याचा विकास करण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बहुतांश रस्ते विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
महापालिकेकडे निधी नसल्याने डांबरीकरण करण्यात आले नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रसार झाल्याने महापालिकेने कोणत्याच रस्त्याचा विकास केला नाही. तसेच कोणत्याच रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याबाबत व्यावसायिक आणि ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या असून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. मात्र महापालिकेने केवळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. शनिवार-रविवारी लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील वाहतुक बंद होती. तसेच गर्दीही नसल्याने नरगुंदकर भावे चौकातील खड्डे बुजविण्यात आले. सध्या तात्पुरती मलमपट्टी करून रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम मनपाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र बाजारपेठेतील खराब झालेल्या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.