प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. या समस्येत सरकारी वाहनांची भर पडली असून, रस्त्यावरच वाहने पार्क करण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे सरकारी बाबूंच्या मनमानी पार्किंगला आळा कोण घालणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहने पार्क करण्यात आल्याने वाहतूक कोंडीच्या डोकेदुखीला वाहनधारकांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: किर्लोस्कर रोड, नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, कचेरी रोड, बसवाण गल्ली आदी ठिकाणी रस्त्याशेजारी चार चाकी वाहने पार्क करण्यात येत असतात. अशातच काही सरकारी वाहने रस्त्यावर पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. काही सरकारी वाहने रस्त्याच्या मध्यभागी पार्क करून वाहनचालक आपले काम उरकण्यासाठी गेले असल्याची बाब सोमवारी रिसालदार गल्ली येथे निदर्शनास आली. सदर वाहन चालकाने रस्त्यावरच वाहन पार्क केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडी निवारणासाठी सरकारी वाहनचालकांनाच सूचना देणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
शहरात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने एकाच ठिकाणी वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र दुचाकी वाहनांसाठी पार्किंग तळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याशेजारी दुतर्फा दुचाकी वाहने पार्क केली जातात. बाजारपेठेत केवळ दुचाकी वाहनांना ये-जा करण्यास मुभा आहे. त्यामुळे चार चाकी वाहने शहरातील अन्य रस्त्यांवर व पार्किंगसाठी जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी पार्क केली जातात. काही वेळा रस्त्याच्या शेजारी अस्ताव्यस्तपणे दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.