वार्ताहर /काकती
यमनापूर गल्ली ते मुस्लीम गल्ली संपर्क रस्ता पूर्णपणे खराब झाला असून सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची व्यवस्था केलेली नाही. परिणामी सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ग्राम पंचायतीने तातडीने लक्ष देऊन पक्का रस्ता व गटारी कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.
येथील यमनापूर गल्ली ते मुस्लीम गल्ली ते शिव छत्रपती पुतळा रस्त्यापर्यंत संपर्क रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खडी उखडून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गटारीची व्यवस्था नसल्याने सांडपाणीही रस्त्यावर साचत आहे. परिणामी या नागरिकांना पायी जाणे, दुचाकी चालवणेदेखील कठीण झाले आहे. चालत जाणाऱयांच्या अंगावर हे सांडपाणी उडत आहे.
या वार्डात येणाऱया लोकप्रतिनिधी, ग्राम पंचायत सदस्य आदींनी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकानी अनेकवेळा ग्राम पंचायतीला या समस्येची जाणीव करून दिली. मात्र चार वर्षे झाली आश्वासनापलीकडे काहीही झालेले नाही. गटार बांधणीसाठी अरुंद रस्त्याची सबब सांगितली जाते.
या भागातील नागरिक या भोंगळ कारभाराला कंटाळले आहेत. नुकतेच निवडून आलेल्या सदस्यांनी पक्का रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्ता हातात येऊनही आता ते दुर्लक्ष करीत आहेत. येत्या पंधरवडय़ात पक्का रस्ता व गटारीची समस्या सोडविण्यासाठी ठाम निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.