प्रतिनिधी/ सातारा
भाजी मंडई सुरू होवूनही तहसिलदार कार्यालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते बसत आहेत. यामुळे सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी सातारा नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या विक्रेत्यांवर कारवाई करत यांना रस्त्यावरून हटविले.
अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडई जिल्हा परिषद मैदानावर सुरू होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भाजी मंडई मुळ ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला तरी काही विक्रेते पुन्हा रस्त्यावर थांट मांडत आहेत. तहसिलदार कार्यालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्यालगत दुतर्फा भाजी विक्रेते बसत आहेत. यामुळे सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही केंडी सोडवताना वाहनधारकांची तारेवरची कसरत होत आहे. या विक्रेत्यांना वारंवार सुचना करूनही हे रस्त्यावरच बसत होते. यामुळे शुक्रवारी सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरून उठवले. ही कारवाई होताच विक्रेत्यांनी आपला भाजीपाला पोत्यात भरत पळ काढला. यामुळे अवघ्या काही तासात रस्त्याने मोकळा श्वास घेतला.