प्रतिनिधी / बेळगाव
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्याचे सत्र सुरूच आहे. राणी चन्नम्मा चौकातील हा रहदारीचा रस्ता असून वाहनांची व पादचाऱयांची ये-जा कायम असते. पण चौकात मागील चार दिवसांपासून रस्त्यावर चर खोदून ठेवण्यात आली असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे.
स्मार्ट सिटी योजनेमधून कोटय़वधी निधी खर्च करून रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. मात्र, याच रस्त्यांची खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यांचा दर्जा टिकून राहणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. रस्त्यावर खोदण्यात आलेल्या चरीमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. राणी चन्नम्मा चौकातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अलीकडेच येथील ट्रॉफिक सिग्नल सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, यापाठोपाठ आता पुन्हा खोदाईसत्र सुरू करण्यात आले आहे. कन्नड साहित्य भवनसमोर राणी चन्नम्मा चौकातील रस्त्यावर चर खोदण्यात आली आहे. हा रस्ता पेव्हर्सचा करण्यात आला होता. पण पेव्हर्स हटवून चर काढण्यात आल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे. डॉ. आंबेडकर मार्गावरून येणारे वाहनधारक न्यायालयाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. पण रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांना चौकामधून वळसा घालून जावे लागत आहे. पण रस्ता खोदण्यात आल्याचे पटकन लक्षात येत नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावरील चर बुजविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
टिळक चौकात भुयारी गटारीचे बांधकाम
बसवाण गल्लीमधून रामलिंगखिंड गल्लीला जोडणाऱया रस्त्यावरील भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येणार आहे. गटारीचे पाणी जाण्यासाठी ही गटार बांधण्याचा प्रस्ताव असून महापालिकेने हे काम हाती घेतले आहे. याकरिता बसवाण गल्लीमधून टिळक चौकात जाणाऱया रस्त्यावर चर खोदण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता सध्या वाहतुकीस बंद आहे. रामलिंगखिंड गल्ली तसेच कोनवाळ गल्लीमधून बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. पण सदर रस्ता बंद ठेवल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर रहदारी मोठय़ा प्रमाणात असते. पण सध्या गटारीचे बांधकाम सुरू असल्याने वाहनधारकांना अन्य रस्त्याने ये-जा करावी लागणार आहे.