वार्ताहर / हुपरी
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील माळभाग परिसरात अनेक दिवसांपासून सांडपाणी व इतर घाणीच्या पाण्याने भरलेल्या गटारची स्वच्छता न केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. अनेकवेळा सांगून देखील ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी गटारीतील दुर्गंधीयुक्त घाण पाणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून ओतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
रांगोळी गावच्या माळभागात राहणाऱ्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला वारंवार घाण पाणी साचून आरोग्यास धोका निर्माण होईल आणि डासांचे प्रमाण वाढेल म्हणून गटार मधील स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या घटनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. काही दिवसानंतर गटारीतील घाण पाण्याची दुर्गंधी पसरली होती. नागरिक संतापले होते.
आज माळभागात राहणारे नागरिक संतप्त होऊन गटार स्वच्छ केली नसल्यामुळे गटारीतील घाण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणून ओतले त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. दरम्यान सरपंच यांना याबाबत विचारले असता सदर ठिकाणी असलेली गटर लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. ज्या नागरिकांनी गटारातील घाण पाणी ओतले आहे. त्यांनी संतापाच्या भरात अनावधानाने घडलेली घटना असल्याचे कबूल करून ओतलेली घान स्वतः स्वच्छ करून घेतली आणि वातावरण निवळले.