गदारोळानंतर संजय राऊत यांची माघार
नेत्यांचा अनादर सहन करणार नाही : थोरात
मुंबई / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजासंदर्भात केलेल्या विधानावरून राज्यातील तणावाचे वातावरण असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेले नवे वादग्रस्त विधान गुरुवारी समोर आले. या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राऊत यांच्या विधानमुळे
काँग्रेस नेते आक्रमक झाले होते. राऊत यांनी विधान मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा राग शांत झाला. तरीही, आमच्या नेत्यांचा अनादर सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत काँग्रेसने राऊत यांना भविष्यात विचारपूर्वक विधाने करण्याचा सल्ला दिला आहे. या वादात भाजपने उडी घेत काँग्रेस-शिवसेनेत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत यांनी काल, बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईत आल्यानंतर पायधुनीला अंडरवर्ल्ड डॉन करीमलालाला भेटात होत्या, असे वादग्रस्त विधान केले. या विधानावरून मोठा गदारोळ निर्माण झाला. काँग्रेस नेत्यांच्या भावना संतप्त झाल्यानंतर राऊत यांनी आपले विधान मागे घेतले. आपल्या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर हे विधान आपण मागे घेतो, असे सांगत राऊत यांनी वादावर पडदा टाकला.
मात्र, राऊत यांच्या विधानावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया देत शिवसेनेला समज दिली. इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेले विधान राऊत यांनी मागे घेतल्याने या वादावर आता पडदा पडला आहे. परंतु, भविष्यात त्यांनी विचारपूर्वक बोलावे. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, असे थोरात यांनी बजावले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. त्यामुळे फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलू नये, असा टोलाही थोरात यांनी लागावला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या विधानावरून शिवसेना आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. इंदिरा गांधी करीम लालाला खरेच भेटल्या होत्या काय? काँग्रेस पक्ष अंडरवर्ल्डच्या ताकदीवर, पैशावर निवडणूक जिंकत होता काय? दाऊद आणि छोटा शकील महाराष्ट्र चालवायचे काय? 80 च्या दशकात मुंबई पोलीस आयुक्तांची नेमणूक अंडरवर्ल्डच्या इशाऱयावर होत होती काय? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांनी याबद्दल काँग्रेसकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
संजय राऊत काय म्हणाले…
करीमलाला हा पठाणांच्या पख्तुन ए हिंद या संघटनेचा नेता होता. सरहद्द गांधी, खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत तो काम करायचा. या माध्यमातून त्याची अनेकांची भेट होत होती. जगभरातील पठाण समाजाच्या समस्यांबाबत ही भेट होत होती. इंदिरा गांधी करीमलालाला मुंबईत भेटायच्या, असा दावा संजय राऊत यांनी पुण्याच्या कार्यक्रमात केला.
कोट
‘इंदिरा गांधींनी मुंबईतील आणि देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम केले. त्यांनी करीम लाला सकट हाजी मस्तान, युसूफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना तुरूंगात टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या’
बाळासाहेब थोरात
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
‘काँग्रेस सत्तेसाठी इतकी लाचार झाली आहे की त्यांच्या कोणत्याही मोठय़ा नेत्याने अद्याप राऊत यांच्या विधानाचा साधा निषेध सुध्दा केला नाही. इंदिरा गांधींवर आरोप झाला असतानाही काँग्रेस नेते गप्प का?’
देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते, विधानसभा
‘इंदिराजी माझ्यासाठी व्यक्तीश: आदरणीय राहिल्या आहेत. त्यांच्याबद्दल केलेल्या विधानांनी जर कुणी दुखावले गेले असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो. माझ्या विधानानंतर भाजपला इंदिरा गांधींबद्दल प्रेमाचा उमाळा आला म्हणून त्यांचा आभारी आहे’
संजय राऊत
शिवसेना नेते
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वत: इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही. राऊत यांनी केलेले विधान वेगळय़ा संदर्भात होते, ते त्यांचे निरीक्षण होते’
आदित्य ठाकरे
शिवसेना नेते
संजय राऊत एक नंबरचे फेकाडे : देशपांडे
‘संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे असून राज ठाकरेंनी त्यांना ‘सामना’मध्ये आणले. राज ठाकरेंनी त्यांना सामनामध्ये आणले नसते तर आज राऊत कुठेतरी कारकुनी करत असते’, असा टोला देशपांडे यांनी राऊतांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना लगावला आहे. ‘संजय राऊत यांना आता तिन्ही पक्षांचे सरकार आल्यानंतर काही काम उरलेले नाही. त्यामुळे काहीतरी वक्तव्ये करुन चर्चेत राहायचे म्हणून ते असे बोलत आहेत,’’ असेही देशपांडे यावेळी म्हणाले.
राऊत यांनी मनसैनिकांनी गाडी फोडण्याची आठवण करुन दिल्यानंतर देशपांडे यांनी यावरुनही राऊतांना सुनावले आहे. “ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे. या घटनेनंतर राज ठाकरेंकडून त्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती,’’ असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे.