आ. गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
अडवण्याचा प्रयत्न कराल तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा
प्रतिनिधी / सांगली
खा. संजय राऊत हे खातात मातोश्रीचे आणि गोडवे मात्र गातात बारामतीच्या गोविंदबागेचे असा टोला मारत धनगर समाजाच्या प्रश्नासाठी लढताना आपल्याला अडवण्याचा प्रयत्न कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आ. गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. राऊत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणारे असल्याची टीका करतानाच विरोधकांवर विष ओकण्याव्यतिरिक्त कधीतरी सामनातून महाराष्ट्राच्या हिताच्या बाबी सांगाव्यात असे आवाहनही आ. पडळकर यांनी यावेळी बोलताना केले.
आ. पडळकर यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विधानभवनासमोर ढोल वाजवत आंदोलन केले होते. त्यावर खा. संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून अग्रलेख लिहीत आ. गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकुचंद पडळकर असा केला होता. फेकूचंद यांना ढोलासकट जेलमध्ये टाकले असते अशी टिका केली होती. त्यावर बोलताना आ. गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना खा.राऊत यांच्यावर सडकून टिका केली. आ. पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून धनगर समाजाच्या प्रश्नावर एकदाही चर्चा झाली नाही. त्याबद्दल सामनातून कधी वाचाही फोडली नाही. पण आपण आमदार झालो तरी समाजाशी आपण नाळ तोडली नाही. सभागृहामध्ये आपण धनगर आरक्षणाबरोबरच भटके विमुक्त, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यांच्याबद्दलही प्रश्न मांडले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ढोल वाजवले.
हिंमत असेल तर अडवून दाखवा
माझ्या समाजाचा ढोल वाजवणे हा माझा हक्क आहे. प्रश्नासाठी एक वेळ नाही तर हजारवेळा मी ढोल वाजवेन. खा. राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रोखून दाखवावे असे आव्हान देऊन आ. पडळकर म्हणाले, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात शिवसेनेचे खासदार निवडून आले. पण त्याची जाणीव न ठेवता उठसूठ आरोप करणे, विरोधकांवर सामनातून विषारी लिखाण करणे असा एकच उद्योग राऊत यांनी केला आहे.
आपल्यालाही खा. राऊत यांना पवारांचे फंटर, दलाल, चमचे असे म्हणता येते पण आपण तसे म्हणणार नाही. तुरूंगात टाकण्याचा इशारा आपल्याला नवा नाही. आजपर्यंत अनेक वेळा आपण तुरूगात जाऊन आलो आहे. तुरूंगातील चटईवर झोपून तिथला भत्ताही खाल्ला आहे. पण, समाजाच्या प्रश्नासाठी आजही तुरूंगात जायची आपली तयारी आहे.
राऊत हे गद्दार
आ. पडळकर म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलो नाही हे आमचे दुर्भाग्य. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने वाटचाल करणारे, त्यांचे विचार जपणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण पाहू शकलो. याचा आनंद आहे. स्व. बाळासाहेब हे आमचीही अस्मिता आहेत. पण संजय राऊत हे त्यांच्या विचारांशी गद्दारी करणारे, शिवसेनाप्रमुखांचे विचार डुबवणारे आहेत. ते खातात मातोश्रीचे पण गोडवे गातात बारामतीच्या गोविंदबागेचे असा टोला मारतानाच त्यांनी आपल्याला हिंमत असेल तर ढोल वाजवण्यापासून रोखून दाखवावे असे थेट आव्हानच आ. पडळकर यांनी दिले.