प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा मंडळाकडे होती. मात्र 24 तास पाणीयोजना राबविण्याबरोबरच देखभाल करण्याची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. ठरलेल्या करारानुसार 6 महिन्यांच्या कालावधीत पाणीपुरवठा मंडळाने सहकार्य केले आहे. मात्र राकसकोप डॅम वगळता आता सर्व यंत्रणा एलऍण्डटीकडे सोपविण्यात आली आहे.
राकसकोप आणि हिडकलद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या 58 पैकी 10 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या 24 तास पाणीपुरवठा योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. ही योजना जनतेच्यादृष्टीने लाभदायक असल्याने आता संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचे काम एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आले असून, हे काम मागील मे महिन्यापासून सुरू झाले आहे. त्याकरिता जुलैपासून शहरातील पाणीपुरवठा वितरणाची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे हस्तांतर करण्यात आली होती. मात्र सर्व नियोजनाची माहिती होईपर्यंत पाणीपुरवठा मंडळाच्या समन्वयाने पाणीपुरवठा करण्यात यावा, असा करार झाला होता.
मात्र पाणीपुरवठा मंडळाच्या समन्वयाअभावी पाणीपुरवठा यंत्रणा राबविण्यात येत होती. परिणामी जुलै महिन्यापासून शहरात पाणीपुरवठय़ाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. मुबलक पाणीसाठा असतानादेखील शहर आणि उपनगरांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणीपुरवठा नियोजन कोलमडल्याने याचा फटका शहरवासियांना बसत आहे. दहा ते पंधरा दिवस पाणी मिळत नसल्याने शहरवासियांचे हाल होत आहेत. विशेषतः उपनगर भागात पाणीसमस्या अधिक आहे. पाणीपुरवठा नियोजनात सहकार्य करण्याची मुदत संपल्याने संपूर्ण कारभार एलऍण्डटीकडे सोपविण्यात आला आहे. लक्ष्मीटेकडी व बसवणकोळ्ळ जलशुद्धीकरण केंद्र, हिंडलगा पंप हाऊस आणि हिडकल पाणी योजनेतील पंप हाऊस अशी सर्व यंत्रणा एलऍण्डटीकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र राकसकोप जलाशयाचा ताबा अद्यापही पाणीपुरवठा मंडळाकडे आहे. मात्र या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी एलऍण्डटीच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत आहेत.
अधिकाऱयांनी आवश्यक कार्यवाही करावी
सर्व व्यवस्था एलऍण्डटी कंपनीकडे हस्तांतर करण्यात येऊनदेखील पाणीपुरवठा नियोजनामधील अडथळे दूर झाले नाहीत. सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नवीन योजना राबविताना सुरळीत पाणीपुरवठा करणे ही जबाबदारी देखील कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.