राजकारणावर लिहिता-लिहिता दिशाहीन होण्याची शक्यता असते. राजकारण तसा रंजक विषय वाटतो, पण तसा तो नाही. खरं तर राजकारण हा अत्यंत गंभीर विषय आहे.
राजकारण म्हणजे काय?
राजकारणाचे हेतू काय?
राजकारणाची साधने कोणती?
राजकारणाचा अंतिम लाभधारक कोण?
राजकारणाचा अंतिम निकष काय?
असे महत्त्वाचे प्रश्न या संदर्भात निर्माण होतात. या प्रश्नांचा आपण विचार करू. प्रथम राजकारण म्हणजे काय?
राजाची कृती कार्यक्रम धोरण म्हणजे राजकारण असा ढोबळ अर्थ होतो. पण मुळात राजा म्हणजे ‘प्रजेचं रंजन करणारा’. रंजन म्हणजे नृत्य-संगीत, गाणं-बजावणं, मनोरंजन एवढाच अर्थ नाही. प्रजेचं रक्षण करणे, गरजेप्रमाणे प्रजेचं पोषण-संवर्धन करणे, प्रजेचं आरोग्य जपणं, प्रजेची शिस्त व्यवस्था राखणं असे ‘प्रजेचं रंजन’ या शब्द रचनेचे अनेकविध अर्थ होतात. प्रजेला न्याय देणे-गुन्हेगारांना शासन करणे यांचाही समावेश व्यापक अर्थाने रंजन या शब्दात करावा लागेल. अशा व्यापक, समावेशक अर्थाने प्रजेचं रंजन करणारा तो राजा व त्याचे काम, धोरण, कार्य पध्दती म्हणजे राजकारण.
राजेशाही ऐवजी राज्यव्यवस्था लोकशाही पध्दतीची, प्रातिनिधक निवडीची असल्यास राजकारणाचा अर्थ आणखी विस्तृत होतो. या पध्दतीत विविध वैचारिकतेवर आश्वासन राजकीय पक्ष, राजकीय सत्ता मिळविण्यासाठी निवडणुका लढवतात. बहुमत (अधिक प्रतिनिधीत्व) मिळविणारा राजकीय पक्षा सत्ताधारी होतो. म्हणजेच व्यावहारिक पातळीवर सत्ता प्राप्तीसाठी राजकीय पक्ष विशेषतः निवडणुकीत जे विविध (कायद्याच्या मर्यादेत) प्रकार करतात, त्याला राजकारण म्हणता येईल.
सत्ता स्थापन झाल्यावर सत्ताधारी पक्ष, बहुमताच्या माध्यमातून सत्तेवर चालू राहण्यासाठी, लोकमान्यता वाढविण्यासाठी, उपरोक्त परिच्छेदात रंजनाचे जे अर्थ सांगितले ते सर्व कमी-अधिक प्रमाणात करतात, तेही राजकारणच!
सत्तेवर नसणारे, पण समाजाच्या कांही लोकांचे प्रतिनिधित्व करणारे, लोक निर्वाचित प्रतिनिधी, सत्तेवरचा राजकीय पक्ष कसा धोरणात, कार्यक्रमात कमी पडतो, त्यांच्याकडून होणारे रंजन कसे अपुरे आहे, ते रंजन आम्ही कसे अधिक चांगले करू, सत्ताधारी राजकीय पक्षाचे कसे चुकत आहे, हे समाजापुढे मांडण्यासाठी जी समीक्षा करतात, जो प्रचार करतात, जे कार्यक्रम राबवतात व आगामी निवडणुका जिंकण्यासाठी जी तयारी करतात, त्यालाही राजकारण म्हणायचे.
म्हणजेच राजकारणाचा अर्थ सत्ताप्राप्ती, सत्ता स्थैर्य व सत्ता सातत्यासाठी राजकीय पक्षांना ज्या प्रकारे व्यवहार करावा लागतो, धोरण ठरवावे लागते, कार्यक्रम राबवावे लागतात व त्या प्रक्रियेत मतदारांचा अनुनय करावा लागतो, त्यालाही राजकारणच म्हणायचे.
ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलेले एक ताजे विधान लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांचे विधान पुढीलप्रमाणे आहे.
i do not cut taxes to win election
i win election to cut taxes
या विधानाचा संदर्भानुसार 45 दिवसांत ज्या बाई ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या, त्यांनी कर कपातीचे धोरण राबवू या आश्वासनावर पंतप्रधानाची निवड पदरात पाडून घेतली होती. तो प्रयोग पूर्णतः अंगलट आला. त्यांना पदत्याग करावा लागला. आता ऋषी सुनक म्हणताहेत की, मी निवडणूक जिंकल्यानंतर कर कपात करेन. म्हणजेच धोरण तेच पण ते कारण करणे वा परिणाम करणे यातील फरक देखील राजकारणच!
अधिक साकल्याने विचार केल्यास, राजकारणाचा अर्थ अधिक नेमका, सर्व समावेशक करता येईल. संभाव्य पर्याय पुढीलप्रमाणे असतील.
समाजाच्या कल्याण वृध्दीसाठी सत्तेचा वापर करणे.
विविध आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक धोरण सर्वहितकारक पध्दतीने वापरणे म्हणजे राजकारण.
उपरोक्त उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी धोरण, कार्यक्रम व कायद्याची व्यवस्था तयार करणे, त्यासाठी विरोधी राजकीय पक्षाला विश्वासात घेणे.
अर्थात राजकारणाचा असा अर्थ लावल्यानंतर राजकारणाचा मुख्य निकष काय हे पाहणे आवश्यक आहे.
समाजाची रचना मत्ता मालकी, रोजगार, सामाजिक/राजकीय दर्जा, संस्कृती, उत्पन्न प्राप्ती यांच्या वैविध्याने नटलेली असते. समाजाच्या प्रत्येक घटकाला सामाजिक कल्याणाचा कमाल हिस्सा स्वतःसाठी पाहिजे असतो. साहजिकच सामाजिक कल्याण समाजाच्या सर्व घटकांना समन्यायी पध्दतीने मिळेल अशी व्यवस्था करणे म्हणजे राजकारण. या संदर्भात इतिहासाच्या ओघात कायदा, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र (राज्यशास्त्र) अशा विविध माध्यमातून राजकारणाचे निकष मांडले गेलेत. ते पर्याय पुढीलप्रमाणे –
बायबलमध्ये यातून शेवटच्या माणसाचा विचार करा. हा निकष पुढे आला. रस्किनने तोच अधिक विस्तारला. पॅरोटो पर्याप्तता म्हणजे इतर कोणाच्याही कल्याणात घट न करता, किमान एकाचे कल्याण वाढविणे असे सांगतो.
उपयोगितावादामध्ये, जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण हा बॅन्थॅमचा विचार रूढ झाला.
सर्व निर्णय समन्यायाने घेणे हाही निकष पुढे आला. उत्पन्नाची उपयोगिता ही घटत्या उपयोगितेच्या नियमास बांधिल आहे असे मानून राजकीय निर्णयाचा लाभ अधिक क्षमतेच्या लोकांना कमी व कमी क्षमतेच्या लोकांना अधिक असा विचार पुढे आला. याउलट राज्य चालविण्यासाठी जास्त क्षमतेच्या लोकांकडून जास्त व कमी क्षमतेच्या लोकांकडून कमी सहयोग (कर) असाही विचार पुढे आला.
कायदा व न्याय व्यवस्थेत ‘नैसर्गिक न्याय’ हा विचार पुढे आला. नैसर्गिक न्यायासाठी समता, फेरवाटप, सोय संतुलन, सापेक्ष संतुलन हे मुद्दे पुढे आले. मूळ प्रेरणा, पुरावा व प्रमाण हे घटकही कायद्याचा आधार आहेत.
सत्याला धरून निर्णय घेणे- सत्यमेव जयते. हा दिसायला सोपा. पण व्यवहाराला अवघड निकष आहे. सत्य म्हणजे काय व सत्य नेमके कोणते हे ठरविणे अवघड असते. पण ऊrल्tप् ज्rान्aग्त्s हे कालांतराने अनुभवाला येते.
मनधरणी, समजावण्यातून मत व व्यवहार परिवर्तन (प्रबोधन) हाही राजकारणाचा एक महत्त्वाचा निकष आहे. त्यासाठी प्रचार, प्रसिध्दी यांचा व अनुनयाचा वापर करावा लागतो.
शिस्त, शासन, निर्भत्सना या माधमातून गैरवर्तन मर्यादित करता येते. तसेच बक्षिस, पुरस्कार, कौतुक या मार्गानेही चांगल्या वर्तणुकीस प्रोत्साहन देता येते.
बहुमताचा मान राखणे हाही राजकारणाचा सोपा निकष आहे.
ज्ञानेश्वरी (भगवत् गीता) मधील पसायदान राजकारणाचे अनेक निकष उघड करते. जे जे वांछिल, तो ते लाहो, सर्वेपि सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामय, यातून राजकारणाचे थेट, साधे निकष प्राप्त होतात. एकूणच काय, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व कायदा यातील प्राथमिक-मूलभूत तत्त्वांचा वापर करूनच, राजकारण करावे लागते. तसे राजकारण समाजहिताचे व राजकारण करणाऱयांच्या लाभाचे ठरते.
प्रा.डॉ. जे.एफ. पाटील