युवा आमदार रोहित पवार यांनी युवकांना दिला कानमंत्र
कोल्हापूर प्रतिनिधी
राजकीय नेत्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या गाड्य़ा, त्यांचे राहणीमान यांना भुलून राजकारणात येण्याचा विचार तरूणाईने करू नये. जर लोकांच्या हिताचे काम करण्याचा ध्यास असेल तर मात्र राजकारणात तरूणाई आश्वासक काम करू शकते. वापर करून घेणाऱ्या राजकीय लोकांपासून लांब रहा आणि आईवडीलांनी तुमच्यासाठी जी स्वप्ने पाहिली आहेत ती पूर्ण करा असा कानमंत्र आमदार रोहित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्यावतीने सोमवारी सायंकाळी रंकाळा येथे आयोजित कार्यक्रमात रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी माजी स्थायी समिती सभापती आदील फरास यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यीनचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात युवकांची बेरोजगारी, शैक्षणिक धोरण, रखडलेली भरती प्रक्रिया, कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा, हददवाढ अशा विविध विषयांवर अनौपचारीक चर्चा झाली.
यावेळी बोलताना आ. रोहीत पवार पुढे म्हणाले, कल्चरल पॉलिटिक्सच्या माध्यमातून तरूणांना भडकवण्याचा प्रकार वाढला आहे. राजकीय लोक तरूणांचा वापर करून घेतात, पण तरूणांनी हेच ओळखलं पाहिजे. डोकं भडकवणारे सिनेमे निवडणूक आली की प्रदर्शित केले जातात जेणेकरून समाजात ताण वाढावा. तरूणाईचा फायदा घेण्याचा हा मार्ग आहे. पण आपला वापर कोण करून घेत आहे हे वेळीच ओळखून अशा प्रवृत्तीपासून लांब रहा. आईवडीलांची स्वप्ने पूर्ण करा. असा सल्लाही त्यांनी दिला.
युवा वर्गाला संबोधित करताना हाताला काम, खायला अन्न आणि डोक्यावर छत असणे महत्वाचे आहे त्यासाठी प्रामाणिकपणे काम करा. राजकीय नेत्यांच्या राहणीमानाला भुलून राजकारणात येऊ नका. लोकांच्या हिताची तळमळ असेल तर नक्की या क्षेत्रात या. पैसे असतील तरच निवडणूक लढवता येते हे चूक असून पैशापेक्षा लोकशक्तीची ताकद मोठी आहे. लोकशक्तीसाठी विश्वास कमवावा लागतो व त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य भरती प्रक्रियेत काही चुकीच्या गोष्टी झाल्याचे लक्षात आले. त्याकडे दुर्लक्ष करून भरती केली असती तर अनेक उमेदवार परिक्षार्थींवर अन्याय झाला असता. त्य़ामुळे ही प्रक्रिया थांबवली. रेटून करण्याची पध्दत राष्ट्रवादीत नाही. आता टीसीएस कंपनीतर्फे परीक्षेचे काम केले जाणार असल्याने पारदर्शकपणे प्रक्रिया राबवली जाईल. असे आ. रोहीत पवार यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती मराठी तरूणांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विभाग सुरू करून केंद्रातील नोकऱ्या प्रत्येक तरूणाला मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.