रजनी मक्कल मंद्रमच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडुत पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीत भाग घेण्यावरून सुपरस्टार रजनीकांत यांचे मंथन अद्याप सुरूच आहे. रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम या स्वतःच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत राजकारणात प्रवेश करण्यासंबंधीचे गूढ कायम ठेवले आहे. संघटनेला बळकट करण्याचे काम सुरूच ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करताना रजनीकांत यांनी राजकारणासंबंधी लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी पार पडलेल्या बैठकीत संघटनेच्या सर्व जिल्हा सचिवांसोबत विचारांचे आदान-प्रदान केले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱयांनी माझ्या प्रत्येक निर्णयाला साथ देण्याचे आश्वासन दिल्याचे रजनीकांत यांनी चेन्नईतील बैठकीनंतर म्हटले आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांनी रजनीकांत यांना स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करत लवकरच पक्षाची स्थापना करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकर्त्यांनी तामिळनाडूतील लोकांसाठी राजकारणात पाऊल ठेवण्याची विनंती केली आहे. सर्व जिल्हा सचिवांचे यासंबंधी एकमत आहे. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मंगळवारपर्यंत अधिकृत विधान करणार असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले आहे. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे उद्गार रजनी मक्कल मंद्रमचे कार्यकर्ते स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी चाहत्यांच्या गर्दीत राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. ‘अध्यात्मिक राजकारण’ सुरू करणार असल्याचे म्हणणारे रजनीकांत आता सक्रीय झाले आहेत. परंतु त्यांनी अधिकृतपणे अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. मागील वर्षीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतलेला नव्हता. परंतु पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीत ते सहभागी होऊ शकतात.