भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांचे उद्गार
प्रतिनिधी / वास्को
राजकारण फारच बदललेले आहे. सर्वच राजकीय पक्षात वाईट गोष्टींचा शिरकाव झालेला आहे. चुकीच्या भावनेने राजकारण प्रवेश हे एक त्याचे कारण आहे. तरूण पिढीचे राजकारणात स्वागत व्हायला हवे. परंतु राजकारण हे समाजकारणासाठी माध्यम आहे. सत्ता, पद, पैसा मिळवण्यासाठी नव्हे हे ध्यानात ठेवायला हवे. केवळ स्वार्थी हेतूने राजकारण प्रवेश करू नये. दुर्दैवाने ही भावना सगळय़ाच पक्षात दिसत असून राजकीय पक्षानी ही भावना दूर करण्यासाठी कार्यरत व्हायला हवे. अन्यथा हीच भावना वाढीस लागेल असे उद्गार माजी सभापती व हिमाचल प्रदेशचे भावी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काढले. राजकारण करण्यासाठी आमदार बनायलाच हवे असेही काही नाही. निवडणूक न लढवताही राजकारण करता येते असे आर्लेकर म्हणाले.
राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरूवारी तरूण भारतच्या टीमने त्यांची वास्कोतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. यावेळी आर्लेकर यांनी विविध गोष्टींबाबत आपली मते व्यक्त केली. तसेच आपली राजकीय सुरवात व राजकारणाबाबत आपले मते, साहित्याबद्दलची रूची अशा विविध गोष्टींबद्दल ते बोलले.
प्रारंभीच्या काळात गोव्यातील भाजपा वेगळा होता. तेव्हाचा भाजपा व आताचा भाजपा यात प्रचंड फरक आहे. तुम्हाला काय वाटतेय, कुठला भाजपा तुम्हाला योग्य वाटतोय असे विचारले असता आर्लेकर म्हणाले की आज पक्षासाठी त्याग करण्याची भावना लोप पावत आहे. पूर्वी अनेक राजकीय पक्ष नेत्यांच्या त्यागामुळे उभे राहिले. जनसंघ, भाजपा, काँग्रेस, समाजवादी असे पक्ष नेत्यांनी त्याग केल्यामुळेच उभे राहिले होते. आता जे पक्ष मोठे झालेले आहेत, ते खरोखरच मोठे झालेले आहेत की ती केवळ सुज आहे याचाही विचार करायला हवा असे राजेंद्र आर्लेकर म्हणाले. चुकीच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश करणाऱयांची संख्या वाढत असून हे लोकशाही आणि राजकारणासाठी योग्य नव्हे. राजकारण हे समाजकारणासाठीचे माध्यम आहे. राजकारण केवळ सत्ता, पद, पैसा प्राप्त करण्याचे साधन नव्हे असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यपालपदाची माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली याचे अप्रुप वाटते
त्या दिवशी मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला. त्यांनी चक्क मराठीतच संवाद साधला. त्यानीच मला राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती दिली. खरं म्हणजे माझ्यासाठी हे आश्चर्यच होते. मला काय बोलावे हेच सुचत नव्हते. खरे म्हणजे ही माहिती मला पंतप्रधान कार्यालयातून देता आली असती. परंतु त्यांनी स्वतःहून दिली. सामान्य कार्यकर्त्यांबाबतही भाजपाचे नेते किती सतर्क असतात याची मला प्रचिती आली. पक्षाने मला राज्यपाल पदाच्या जबाबदारीसाठी पात्र ठरवल्याबद्दल आणि दिलेल्या संधीबद्दलही आनंद वाटला अशी प्रतिक्रीया माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली.
राजकारण करण्यासाठी आमदार बनायलाच हवे असे काही नाही
आपल्या राजकीय प्रवेशाच्या सुरवातीच्या काळासंबंधी बोलताना ते म्हणाले की, भाजपाचे कार्य जेव्हा मी करायला सुरवात केली, तेव्हा कधी वाटले नव्हते की मला निवडणुक लढवावी लागेल. भाजपाचे सरकार स्थापन व्हावे यासाठी इतरांबरोबर मीही काम करायला हवे एवढे माहित होते. परंतु पुढे परिस्थितीच अशी आली की निवडणुक लढवावी लागली. माझ्या स्वभावानुसार मला समाजसेवा करायला हवी असे वाटत होते. परंतु त्यासाठी निवडणुक लढवायलाच हवी असे काही नाही. राजकारणाशिवायही ते करता येते हे माझे प्रामाणिक मत आहे. मी आमदार असताना आणि नसतानासुध्दा राजकीय सामाजीक काम करीत आलेला आहे.
आमदार, मंत्री, सभापती म्हणून समाधानकारक कार्य
दुसऱयांदा आमदार बनल्यानंतर सभापतीपदी माझी नियुक्ती झाली. सभापती म्हणून माझ्या कार्याबद्दल मी माझ्या पुरता तरी समाधानी आहे. मला ज्या काही गोष्टी सुचल्या त्या मी केल्या काही नव्या योजना होत्या. त्याही पूर्ण केल्या असता. प्रत्येक आमदारासाठी सचिवालयात चेम्बर असावे असा माझा विचार होता. मात्र, नंतर मला मंत्रीपद स्विकारावे लागले. सभापतीपद हे घटनात्मक जबाबदारीचे असल्याने ते कर्तव्य बजावताना काही मर्यादा येतात. सभापती तसा लोकांपासून थोडा दूरच असतो. मंत्र्यांचे तसे नसते. त्यांना सरळ लोकांमध्ये मिसळता येते. त्यामुळे मलाही मंत्रीपदाबद्दल थोडे आकर्षण होते. मंत्री म्हणून मला खूप कमी अवधी मिळाला. तरीसुध्दा ती जबाबदारीसुध्दा मी समाधानकारकरीत्या पार पाडली असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपद हुकले याची खंत नव्हतीच
सभापतीपदी असताना मुख्यमंत्रीपद हुकले याची खंत वाटली होती काय असा प्रशन सहजच केला असता ते म्हणाले की खंत वगैरे काही नाही. थोडेसे खटकले एवढेच. सभापतीपदी असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत माझे नाव होते. मुख्यमंत्री म्हणून निवड ठरलेली होती हे खरे आहे. मला तसे सांगितले गेले होते. परंतु पुढे त्यात बदल झाला. थोडे खटकले. मात्र, माझी त्या बद्दल काही तक्रार नव्हती. मी निराश झालो नाही. काम करीतच राहिलो. काही गोष्टी आपल्या भल्यासाठीही घडत असतात असे मला वाटते.
राजकारणाप्रती तृच्छ भावनेला राजकारणीच जबाबदार
राजकीय पक्ष आणि त्यांच्या राजकारणाची दिशा या विषयी बोलताना सगळय़ाच राजकीय पक्षात वाईट गोष्टी शिरलेल्या आहेत असे आर्लेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले राजकारणातही राजकारण होते हे खरेच आहे. राजकारण या शब्दाचा अर्थ वाईट भावनेने घेतला जातो. माझ्याशी राजकारण खेळू नकोस असे शब्द लोकांच्या तोंडून बाहेर पडत असतात. राजकारण या शब्दाला तृच्छ लेखण्याची ही भावना राजकरणी लोकांच्या वागणुकीमुळेच रूजलेली आहे. राजकारणीच याला जबाबदार आहेत. राजकारणातील राजकारणाचा अनुभव मलाही आलेला आहे. तरीही राजकारणापासून विरक्ती घ्यायची असा निर्णय मी कधी घेतलेला नाही. राजकारण म्हणजे केवळ निवडणुक लढवणे नव्हे. निवडणुकीच्या राजकारणाचा मला थोडा उबग आला होता हे खरे आहे. परंतु राजकारणातून बाहेर पडाव असे मला कधी वाटले नाही. मी निवडणुक लढवायलाच हवी असे मी कधीच मानले नाही. कुणीच कधी आमदारकीचा अमरपट्टा घेऊन येत नाही. आमदारकीवीना पूर्वीही काम करायचो. आताही करतो. निवडणुकीविनाही राजकारण करता येते ही माझी भावना आहे. ही माझी भावना मी भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांसमोरही व्यक्त केलेली आहे असे आर्लेकर म्हणाले.
राजकीय नेत्यांना साहित्याची जाण असायला हवी
साहित्य आणि राजकारण यांचा काही संबंध आहे काय याविषयी बोलताना आर्लेकर म्हणाले की प्रत्येकाला साहित्याची आवड असायला हवी. कारण साहित्याचे वाचन प्रत्येक क्षेत्रात कामी येत असते. राजकारणातही या ज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे राजकीय नेत्यांना साहित्याची जाण असायलाच हवी. साहित्यात जीवन जगण्याची व जीवन समृध्द करण्याची शिकवण असते. ज्यांना साहित्याची जाणीव असते त्यांची काम करण्याची पध्दत त्यांची वागणुक व त्यांची प्रवृत्ती वेगळीच असते. साहित्याची जाणीव असलेले राजकारणी आणि जाणीव नसलेल्या राजकारण्यामधील फरक त्यांच्या कार्यपध्दतीत लगेच जाणवत असतो असे आर्लेकर म्हणाले.