काँग्रेस नेते शशी थरूर यांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्यासंबंधी विधान केले आहे. श्रीधरन यांचा भाजप केरळ निवडणुकीत काही जागा वगळता अन्यत्र गंभीर दावेदार नाही. भाजपने मागील निवडणुकीत एक जागा जिंकली होती, त्या कामगिरीत सुधारणा करणे त्याच्यासाठी अवघड ठरणार असल्याचे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.
केरळ निवडणुकीवरील श्रीधरन यांचा सर्वात महत्त्वपूर्ण प्रभाव भाजपमध्ये सामील होण्याच्या घोषणेच्या स्वरुपात समोर येणार आहे. श्रीधरन यांना राजकीय अनुभव नाही, केरळ निवडणुकीत त्यांचा प्रभाव किमान राहणार असल्याचे थरूर म्हणाले.
केरळमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपचा या राज्यात विशेष प्रभाव नसला तरीही पक्षाने यंदा जोरदार कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच मूळचे केरळचे असलेले आणि मेट्रो मॅन या नावाने प्रसिद्ध ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्रीधरन यांच्यामुळे केरळमध्ये मोठे बळ मिळण्याची अपेक्षा भाजपला आहे.