कोरोनाविरूद्ध युद्धासंबंधी केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे प्रतिपादन, राजकीय पक्षांना कानपिचक्या : ही वेळ राजकीय हेव्यादाव्यांची नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा उदेक हे भारतासह साऱया जगावर कोसळलेले संकट आहे. या युद्धात आपण साऱयांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून उतरणे आवश्यक आहे. तरच आपण यशस्वी होऊ शकू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी येथे केले. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि दिल्ली प्रशासनाच्या इतर अधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन दिल्लीतील परिस्थिती त्यांना कथन केली. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लादण्याच्या शक्यतेचा तेथील मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला.
या महत्वाच्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सध्या दिल्लीतील कोरोना स्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. मुंबई आणि महाराष्ट्र तसेच तामिळनाडूच्या खालोखाल दिल्लीतील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो केजरीवाल यांना पसंत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते सोमवारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले, असेही सांगण्यात येते.
याच अनुपस्थितीला उद्देशून अमीत शहा यांनी राजकारण टाळण्याची सूचना केली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे. एकमेकांवर दुगाण्या झाडण्याची नव्हे. तसेच क्षुद्र मतभेदानांना थारा देण्याचीही नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला भाजप, काँगेस, आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते.
दिवसभरात दोन बैठका
केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सोमवारी दिवसभरात दोन बैठका आयोजित केल्या होत्या. रविवारी त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन इत्यादी नेत्यांशी चर्चा केली होती. सोमवारीही हे बैठकांचे सत्र सुरू राहिले होते. दिल्लीतील स्थिती कशी नियंत्रणात आणता येईल यावरच या बैठकांमध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला.
500 रेल्वेडबे उपलब्ध
दिल्लीत रूग्णसंख्या वाढण्याचा वेग अतिप्रचंड आहे. परिणामी उपचारांसाठी रूग्णालयांमधील बेडस् कमी पडत आहेत. म्हणून केंद्रीय रेल्वे विभागाने रेल्वेचे 500 डबे रूग्णांना ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. या डब्यांचे रूपांतर तात्पुरत्या कोरोना रूग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान 30 हजार रूग्णांची सोय होऊ शकते. दिल्ली सरकारनेही या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
पावसाळय़ाच्या मध्यावर…
जुलैच्या मध्यापर्यंत दिल्लीतील कोरोना स्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा आयसीएमआरने दिला आहे. सध्या दिल्लीत प्रतिदिन सरासरी 1.5 हजार रूग्ण वाढत आहेत. हे प्रमाण येत्या तीन आठवडय़ात 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. तो लक्षात घेऊन संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नवी उपाय योजना करण्याचे केंद्र सरकारकडून ठरविण्यात आले आहे.
रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असले तरी सध्या उपचारांमध्ये असणाऱया रूग्णांसाठी पायाभूत सुविध कमी पडण्याची शक्यता आहे.
समितीची स्थापना
नीती आयोगाच्या अध्यक्षतेत दिल्लीतील कोरोना नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. नीती आयोगाचे अधिकारी व्ही. के. पॉल हे या समितीचे अध्यक्ष असतील. खासगी रूग्णालयांचे 60 टक्के बेडस् कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. हे बेडस् किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय खासगी रूग्णालयांनी घेतला. या सर्व प्रक्रियेवर ही समिती लक्ष ठेवणार आहे. तसेच सरकारला वेळोवेळी सूचना करणार आहे. अमीत शहा यांनी या समितीशीही विचारविमर्श केला असून शक्य ते सर्व उपाय केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.