शिवप्रेमीमध्ये संताप, काही वेळ वातावरण तंग
प्रतिनिधी / म्हापसा
शिवजयंतीनिमित्त कळंगूट येथे मिरवणूक काढण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामागे राजकारण असून बार्देश तालुक्यातील एका बलाढय़ राजकर्त्यांने हे कृत्य केल्याची एकच चर्चा आहे. शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी येत्या शिवजयंतीपूर्वी आम्ही कोणत्याही परिस्थितीत कळंगूटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारच असे शिवजयंती समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने मिरवणूक काढण्याची तयारी केली होती. त्यासाठी असंख्य शिवप्रेमीही येथील श्री शांतादुर्गा मंदिराजवळ एकत्रित आले पण मिरवणूक सुरु होण्यापूर्वीच कळंगूटचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी परवानगी नाकारल्याचे पत्र समितीला सादर केल्याने तणाव निर्माण झाला.
परवानगी नाकारली असल्याची माहिती वाऱयासारखी सर्वत्र पसरल्यावर येथे तणाव निर्माण झाला. मिरवणुकीमुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करुन परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी शिवप्रेमींना दिल्यावर समितीचे पदाधिकारी गुरुदास शिरोडकर, सुदेश शिरोडकर आदींनी निरीक्षकांना घेरले व आम्ही शांततेत ही मिरवणूक काढणार होतो मग अचानक परवानगी का नाकारली. हा आदेश कोणाच्या सांगण्यावरुन काढण्यात आला असे अनेक प्रश्नांचा भडीमार करुन पोलिसांना धारेवर धरण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा आणण्यात आला होता शिवाय घटनास्थळी मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर उपस्थित होते.
परवानगी नाकारल्याचे कळताच शिवप्रेमींनी प्रशासना विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. सर्वांनी श्री शांतादुर्गाच्या मंदिरात गाऱहाणे घालून, घंटा नाद करीत जोरजोराने घोषणा दिल्या व अखेर गडय़ांनी जाण्याचा निर्णय मागे घेत शिवप्रेमींनी पायी मिरवणूक काढणे पसंत केले. या समितीने स्थानिक ढोलताशे पथक मिरवणुकीसाठी सांगण्यात आले होते मात्र त्यांवर दडपण आणून त्यांना बाजूला केल्याने अखेर मडगाव येथील पथक मागवून ही मिरवणूक काढण्यात आली. या प्रकाराचा अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी निषेध केला. निरीक्षकांनी मिरवणुकीसंबंधी नकारात्मक अहवाल दिल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नसल्याने सरकारच्या कृतीचा व प्रशासनाचा आपण तीव्र निषेध करतो असे ते म्हणाले. परवानगी नाकारण्या मागचे नेमके कारण स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. वातावरण शांत झाल्यावर वाहनांचा वापर न करता वाजत गाजत कळंगूट गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पायी मिरवणूक काढण्यात आली.