सावंतवाडी
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञानभांडार असलेल्या राजगृहाची नासधूस करणाऱया समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, अशा मागणीचे निवेदन सावंतवाडी तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्यावतीने बुधवारी प्रांताधिकाऱयांना देण्यात आले.
डॉ. आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ निवासस्थानाची सात जुलैला काही समाजकंटकांनी नासधूस केली आहे. पोलीस यंत्रणेने समाजकंटकांचा शोध घेऊन अटक करावी. या प्रवृत्तीचा सावंतवाडी तालुक्यातील एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. निवेदनाची सरकारने दखल घ्यावी, असे नमूद केले आहे. सदर निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी ऍड. एस. व्ही. कांबळे, नारायण आरोंदेकर, किशोर जाधव, दाजीबा कांबळे, गौतम हिवळेकर, अशोक कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.