बेळगाव-दिल्ली फेरीला उत्तम प्रतिसाद : 2 हजार 426 प्रवाशांचा प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली या शहराला बेळगावमधून 13 ऑगस्टपासून विमानसेवा सुरू झाली. या विमानफेरीला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला असून महिनाभरात 2 हजार 426 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. आठवडय़ातून केवळ दोन दिवस विमानसेवा असतानाही विमानफेरी पूर्ण क्षमतेने भरत असल्याने दिल्ली प्रवास सुसाट सुरू आहे.
बेळगाव ते दिल्ली विमानफेरी सुरू करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होती. अखेर ऑगस्ट महिन्यात ही मागणी पूर्ण झाली. स्पाईसजेट या विमान कंपनीने 13 ऑगस्टपासून बी 737-700 ही 149 आसन क्षमता असणारी एअरबस सुरू केली. पहिल्या फेरीपासूनच दिल्ली शहराला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. सोमवार व शुक्रवार अशी आठवडय़ातून दोन दिवस विमानफेरी सुरू करण्यात आली आहे. अवघ्या 2 तास 30 मिनिटांमध्ये बेळगावहून दिल्लीला पोहोचता येत आहे.
दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने दररोज प्रशासकीय व इतर कामांसाठी नागरिकांची ये-जा असते. एक महिन्याच्या कालावधीत एकूण 9 फेऱया झाल्या. त्यामध्ये 1 हजार 232 प्रवासी बेळगावमध्ये आले तर 1 हजार 194 प्रवासी बेळगावमधून दिल्लीला गेले आहेत. एका महिन्यात प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने विमानतळ प्राधिकरणाकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लष्करी जवानांची संख्या अधिक…
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, टी. ए. बटालियनचे कार्यालय, एअरफोर्सचे तळ बेळगावमध्ये असल्याने नेहमीच जवानांची इतर राज्यांमध्ये ये-जा असते. दिल्ली येथून जवळपासच्या इतर राज्यांमध्ये जाणे सोयीचे होत असल्याने जवानांकडून दिल्ली शहराला पहिली पसंती दिली जाते. यापूर्वी बेळगावमधून हैदराबादमार्गे दिल्ली असा प्रवास करावा लागत होता. परंतु आता थेट विमानप्रवास करता येत असल्याने विमानात लष्करी जवानांचीच संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.
महिन्यात…
- आलेले प्रवासी-1 हजार 232
- गेलेले प्रवासी-1 हजार 194
- महिनाभरात झालेल्या फेऱया-9