रविवारी सकाळी ८ वाजता मार्ग रिकामा करणार
प्रतिनिधी /दिल्ली
वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान मोदी यांनी मागे घेतल्याचे जाहीर केल्यावर आणि हे कायदे संसदेत रद्द करण्याचे सोपस्कार पार पडल्यावर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन संपल्याचे शेतकरी संघटनेर्फे गुरुवारी जाहीर केले होते. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन सीमेवर शेतकरी १५ महिने ठाम मांडून आंदोलन करत होते. आता या सर्व जागा रिकाम्या करायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, १५ डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चा अधिकृतपणे त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांनी परतीचे मार्ग धरले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या सिमेवरील आंदोलन वर्षभरानंतर संपल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांचा मोठा गट उद्या सकाळी ८ वाजता जागा रिकामी करेल. आजच्या मीटिंगमध्ये, आम्ही बोलू, प्रार्थना करू आणि ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांच्या भेटीगाठी घेऊ, असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं. लोकांनी आधीच जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेला 4-5 दिवस लागतील. मी १५ डिसेंबरला निघणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुखांनी दिली. टिकैत यांनी गाझीपूर बॉर्डरवर पत्रकारांशी संवाद साधला.