राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वागत
प्रतिनिधी/ सातारा
भक्ती शक्तींचा संगम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी पादुका सोहळा गेली सात वर्ष किल्ले रायगड ते पंढरपूर असा करण्यात येतो. यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत हा पाळखी सोहळा पंढरपूरात एकादशीला पोहचला. तेथून पुन्हा परतीच्या मार्गावर असताना बुधवारी साताऱयात पोहचला. साताऱयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची आणि छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीची भेट झाली. शिवतीर्थावर पालखीचे स्वागत करुन विधीवत पूजन करुन पुढे किल्ले रायगडच्या दिशेने पादुका रवाना झाल्या.
गेल्या सात वर्षापासून दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरुन पंढरपूरला पायी पालखी सोहळा काढण्यात येतो. गतवर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा सर्व नियम पाळून काढला जातो. यावर्षीही किल्ले रायगडावरुन छ.शिवाजी महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान चतुर्थीला पंढरपूरच्या दिशेने झाले. एकादशीला पादुका पंढरपुरात पोहचल्या. तेथे भक्ती आणि शक्तींचा संगम झाल्यानंतर पुन्हा परतीच्या वाटेवर असताना महापुरामुळे थोडासा पालखी सोहळयास विलंब झाला. हा पायी पालखी सोहळा सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर, सनसेनापती बाळाजीराव घोरपडे, सरसेनापती संताजीराव घोरपडे, सरसेनापती धनाजीराव जाधव, रणवीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधींची भेट घेवून राजधानी साताऱयात बुधवारी पोहचला. सकाळी छत्रपती शाहु महाराजांची समाधीस्थळी भेट छत्रपतींच्या पादुकांची भेट झाली. तेथे संगममाहुलीत छत्रपतींच्या पादुकांचे स्वागत संगममाहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे यांनी केले. तेथून पोवई नाका येथे या पादुका पोहचल्यावर जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात स्वागत करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे ऍड. नितीन शिंगटे, मनोज देशमुख, अध्यक्ष यशवंत गायकवाड, उपाध्यक्ष रवीराज गायकवाड, राजेंद्र माने, भारत कुचेकर, शिवभक्त अद्वैत प्रभावळकर, स्मितल प्रभावळकर, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर यांनी स्वागत केले. संदीप मंहिद गुरुजींनी शिवपादुकांचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अविभादन करुन प्रदक्षिणा घालून पुढे रायगडाच्या दिशेने या पादुका रवाना झाल्या. या पादुका रायगडावरुन पुन्हा शिवनेरीकडे जाणार आहेत.
याबाबत माहिती देताना संदीप महिंद गुरुजी म्हणाले, गेली सात वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका किल्ले रायगड ते पंढरपूर अशा जात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीचे स्वरुप दोन वर्षापासून बदलले गेले. प्रशासनाच्या आग्रहाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पालखी सोहळे गेले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपलं स्वास्थ जपत, समाजाचे स्वास्थ जपत शिवछत्रपतीच्या पादुका रायगड ते पंढरपूर चालत गेल्या. मागच्यावर्षीही चालत गेल्या. यावर्षीही चालत प्रवास केला. गेली सात वर्ष प्रवास सुरु आहे. पंढरपूरहून आज राजधानी साताऱयात पोहचल्या. साताऱयावरुन किल्ले रायगडाच्या दिशेने प्रस्तान आणि तेथून पुन्हा शिवनेरीवर पोहचतील, असे त्यांनी सांगितले.