मोबाईल कंपन्यांना मुक्तहस्त वाहनाचालकांच्या हालांकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील दैनावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही म्हणून सर्व स्तरांमधून संताप व्यक्त करण्यात येत असतानाच खुद्द राजधानीतच पुन्हा रस्ते खोदण्यास मान्यता देऊन सरकारने या आगीत तेल ओतले आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राज्याच्या विकासावर भरभरून बोलताना नेत्यांना शब्द अपुरे पडत असले तरीही राज्यातील रस्त्यांच्या स्थितीवर मात्र कुणीच बोलत नाहीत. सध्या या रस्त्यांवरून वाहन चालवणे अशक्यच, पायी चालणेसुद्धा शक्य होत नाही, अशी परिस्थिती आहे. गत कैक महिन्यांपासून राज्यातील जवळ जवळ प्रत्येक मतदारसंघात, शहरी भागात हेच चित्र आहे. साबांखामंत्री दीपक पाऊसकर प्रत्येक वेळी ’पाऊस’ थांबल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करणार असल्याचे सांगत असले तरीही अनेक पावसाळे संपूनही रस्त्यांवर डांबर पडत नाही हेच सत्य आहे. आता तर त्यांनी या खड्डय़ांसाठी पत्रकार आणि समाजमाध्यमांनाच दोशी धरले आहे. ’इवलेसे खड्डे पत्रकार ’झूम’ करून भलेमोठे दाखवतात’, असा थेट आरोपच त्यांनी केला आहे.
रस्त्यांच्या या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. आंदोलने केली. खड्डय़ात वृक्षरोपण केले. छायाचित्र स्पर्धा आयोजित केल्या. तरीही साबांखामंत्री कानामनावर घेत नाहीत. कहर म्हणजे आता दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनाच या खड्डेमय रस्त्यांनी दगा दिला आहे. या रस्त्यांमुळे आपल्या मानेला व्याधी जडली असल्याची तक्रार त्यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. कंत्राटदारावर वचक ठेवा, कारवाई करा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. पॉश वाहनातून फिरणाऱया मंत्र्यावर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचे यापेक्षा चांगले उदाहरण असू शकत नाही, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत.
’राजधानी हा राज्याचा चेहरा असतो’, असे म्हणतात. परंतु राजधानीतील रस्त्यांची अवस्था तर खाण भागातील रस्त्यांपेक्षाही वाईट बनली आहे. या रस्त्यांना फोडाफोडीचे गृहण लागले आहे. त्यामुळे अनेकदा एका बाजूने दुरुस्ती तर दुसऱया बाजूने खोदकाम असे चित्रही यापूर्वी दिसून आले आहे. एरव्ही शहरातील रस्ते कितीही वाईट असले तरी चर्च चौकातून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत जाणारा आल्तिनो रस्ता चकचकीत असायचा. हा रस्ता खोदण्याचे धाडस सहजा कोणतीही कंपनी, कंत्राटदार करत नसे. खोदावाच लागल्यास त्वरित पूर्ववत करण्यात येत असे. परंतु, गेल्या वर्षभरापासून हा रस्ताही अनेक ठिकाणी खोदलेला, खड्डेमय दिसून येत आहे.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार राजधानीतील रस्ते डिसेंबरपर्यंत तरी दुरुस्त होण्याची शक्यता दिसत नाही. हल्लीच हे रस्ते खोदण्यासाठी एका मोबाईल कंपनीस नव्याने मान्यता देण्यात आली असून कित्येक भागात केबल टाकण्याचे काम सुरूही झालेले दिसत आहे. त्यामुळे पुढील दोन महिने तरी पणजीकरांना खड्डेमय रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागणार हे स्पष्ट आहे.