मनपा, मार्केटमध्ये काम करणारे कामगार चिंबल भागातील
प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजीसमोर सध्या धोक्याची घंटा वाजत आहे. चिंबल परिसरात वाढणारे कोरोना रुग्णांचे प्रमाण राजधानीला एक दिवस अडचणीत आणू शकते. पणजी महानगरपालिकेत काम करणारे बहुतेक कामगार चिंबल भागात राहतात. मार्केटमध्ये काम करणारे तसेच भाजीपाला विक्रेते चिंबल, मेरशी, सांताक्रुझ, ताळगाव भागात राहतात. बस व अन्य छोटय़ा वाहनांवर चालक म्हणून काम करणारे अनेकजण याच भागामध्ये राहतात. मेरशी, सांताक्रुझ, चिंबल येथे राहणाऱया अनेकांची कर्मभूमी पणजी आहे. त्यामुळे ही गोष्ट पणजीसाठी प्रचंड धोकादायक ठरू शकते.
पणजी मनपात काम करणारे अनेक कामगार विक्रेते चिंबल, मेरशी, सांताक्रुझ, ताळगाव भागात राहतात. त्याच बरोबर पणजी मार्केटमध्ये फळ-भाजी विक्री करणारे तसेच अन्य छोटी दुकाने असलेले व्यावसायिक याच भागात राहतात. मासळी विक्री व्यवसायाशी संबंधित अनेक कामगार हे चिंबल, मेरशी भागात राहणारे आहेत. मार्केटमध्ये बाहेर बसून आंब्यांची विक्री करणारे बहुतेक याच भागात राहतात. त्यामुळे राजधानी पणजीत कोरोनाचा फैलाव होण्याची जास्त शक्यता आहे. रात्री चिंबल, मेरशी, सांताक्रुझ भागात जाणारे कामगार दिवसभर पणजीत असतात. त्यामुळे पणजी सध्या धोक्याच्या छायेत वावरत आहे.
मेरशी, सांताक्रुझ, ताळगाव भागही धोक्यात
चिंबलमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मेरशी भाग, सांताक्रुझ व ताळगाव हे चिंबल जवळचे भाग आहेत. त्यामुळे चिंबलमधून कोरोनाचा फैलाव मेरशी, ताळगाव, सांताक्रुझ या भागात होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. मांगोरहीलसारखी स्थिती या भागात होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. झोपडपट्टी भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. झोपडपट्टी भागात पाच हजार प्नाक्षा जास्त लोक राहतात. चिंबल, मेरशी व अन्य भागातील लोकसंख्या मोठी असून लोकवस्तीही दाट आहे. जर या भागात कोरोना फैलावल्यास रोखणे कठीण होणार आहे. त्यामुळे आतापासून सरकारने याची काळजी घ्यायला हवी.
पुढील तीन महिने धोक्याचे ?
पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची भीती व्यक्त होत आहे. गोव्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही सावधानतेचा इशारा दिला आहे. गोव्यात पाऊस मोठय़ा प्रमाणात पडतो. 120 इंचापर्यत पाऊस होतो. जून, जुलै महिन्यात पाऊस सलगपणे कोसळतो. वातावरणातील गारवा वाढला जाणार आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढत जाण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनची मागणी निरर्थक नाही
राज्याच्या विविध भागात आता लोक स्वच्छेने लॉकडाऊन करत आहेत. मेरशी भागातही लॉकडाऊनचा विचार केला जात नाही. सरकार लॉकडाऊनवर भर द्यायला तयार नाही त्यामुळे लोक आता स्वतः पुढाकार घेऊन लॉकडाऊन करीत आहेत. राज्यात ग्रीन झोन असताना सरकारने साधारणपणे दोन महिने लॉकडाऊन केले पण आज कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना सर्व खुले केले आहे. याचा परिणाम गंभीर होण्याची भीती सर्वसामान्य जनतेमधूनही व्यक्त केली जात आहे. गोव्याच्या विविध भागात सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हाच पर्याय, असा सूर लोकामधून व्यक्त होऊ लागला आहे.