वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वरीष्ठ सेनाधिकाऱयांची चर्चा करून संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शुक्रवारी त्यांची येथे सेनाधिकाऱयांबरोबर बैठक झाली. सर्व संघर्षबिंदूंपासून चीनने माघार घेतल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी अधिकाऱयांना महत्वपूर्ण सूचना दिल्याचे समजते.
गेल्या सोमवारपासून चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून माघार घेण्यास प्रारंभ केला होता. गुरूवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली. भारतानेही या सर्व भागांमध्ये चीनच्या तोडीस तोड तयारी केली होती. पण दोन्ही सेना आता त्यांच्या मूळ रेषेच्या आत परतल्याने सीमेवरील तणाव निवळल्याचे दिसत आहे.
अखंड सावधानता बाळगणार
चीनने सध्या माघार घेतली असली तरी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे घातक ठरू शकते हे भारतीय सेनेला ज्ञात आहे. परिणामी सीमेवर अखंड पहारा दिला जात आहे. नेहमीच्या पद्धतीने गस्त सुरू असून आता फिंगर 4 आणि 15 व्या बिंदूपर्यंतही लक्ष ठेवता येत आहे, असे सांगण्यात आले. 30 जूनला दोन्ही सेनांच्या अधिकाऱयांची बैठक झाली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अनुसार दोन्ही देश कृती करत आहेत. राजनाथसिंग यांनी या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला असून सूचना केल्या आहेत.
उपग्रहीय चित्रणातून स्थिती स्पष्ट
चीनने सर्व वादग्रस्त भागांमधून माघार घेतल्याचे आता उपग्रहीय छायाचित्रांच्या पुराव्यानेही सिद्ध झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये घेतलेल्या छायाचित्रांमध्ये चीनने नियंत्रण रेषेवरून आपले तंबू, सैनिक, शस्त्रे, वाहने आणि इतर बांधकामे हटविल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे निदान सध्यातरी तणाव निवळल्याचे समजत आहे. तसेच भारताने सीमेवरील रस्तेबांधणी पुढे चालूच ठेवली आहे. त्यामुळे येत्या तीन चार वर्षांमध्ये सीमेची सुरक्षा अधिक चांगली होणार आहे.