विस्तारवादी शक्तींना प्रत्युत्तर देणार
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनला पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे. विस्तारवादी धोरणांना चोख प्रत्युत्तर देणार आहोत. बर्हिगत धोक्यांना सामोरा जाण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे. आमच्या सुरक्षेसाठी धोका ठरणाऱया कुणालाच मोकळे सोडणार नसल्याचे राजनाथ म्हणाले.
विस्तारवादी देश आमच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला धडा शिकविण्यात येणार आहे. स्वतःची भूमी कुणाच्याच हातात न जाऊ देण्याची शक्ती भारताकडे असल्याचे राजनाथ यांनी एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भारतीय सैन्य देशाचा गौरव कधीच कमी होऊ देणार नाहीत. स्वतःच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारी कुठलीच गोष्ट भारत सहन करणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी यापूर्वीच्या सरकारांवर कुठलेच प्रश्नचिन्ह उपस्थित करू इच्छित नाही. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. शक्य तितक्या सुविधा आणि क्षमता सुरक्षा दलांना प्रदान करत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.