नागरिक “त्यांना” मतदान पेटीतूनच संपवतील- राऊळ
सावंतवाडी /प्रतिनिधी-
चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकास महामंडळाबाबत राजन तेली यांनी सूचना का केली नाही किंवा एक शब्दही का काढला नाही. उलट आमदार दीपक केसरकर यांनी सुरू केलेल्या या पर्यटन विकास महामंडळाच्या कामाबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नेहमी राजकारणात पाण्याच्या प्रवाहात हात धुऊन घेणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांची नेहमीची बोलबच्चनगिरी जिल्हावासीयांना माहित आहे. त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष संजू परब हे गेली दीड वर्ष होते कुठे त्यांनी या कामांबाबत आधी तोंड का उघडले नाही याचा जाब तेली यांनी परब यांना विचारायला हवा होता. आता फक्त नौटंकीचे नाटक करू नये असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी निवेदनातून तेली यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार दिपक केसरकर यांच्यावर टीका करत पर्यटन विकास महामंडळाच्या कामांची आपण चौकशी बाबत लक्ष वेधणार आहे असे म्हटले होते. त्याला राऊळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले आमदार दीपक केसरकर यांची इच्छा आजवर सावंतवाडीकरांनी पूर्ण केली आहे. इथली जनता ही दीपक केसरकर यांच्यावर प्रेम करते, त्यांचा आदर करते. त्यामुळे त्यांची इच्छा सावंतवाडीकरच पूर्ण करतील.
त्यामुळे यांना संपवायचं काम आमदार केसरकर नाही तर त्यांचावर प्रेम करणारी जनताच करेल. कोण भ्रष्टाचार करू शकतं, हे इथल्या जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे कोणाला संपवायचं हे जाणण्याइतपत जनता सुज्ञ आहे. त्यामुळे नागरिक मतदान पेटीतूनच त्यांना संपवतील.