गौरी थोरात यांच्या दीडशेव्या एकपात्री प्रयोगास टाळय़ाचा पाऊस
प्रतिनिधी/ सातारा
होय मी लखूजी जाधवांची छोटीशी जिजाऊ…शहाजी राजांच्या राणीसाहेब..शिवछत्रपतींच्या मॉसाहेब…संभाजीराजेंच्या आऊसाहेब..आणि अख्या दख्खनची जिजाऊसाहेब…मी माझ्याच जन्माच अख्यान मांडलय…अशा संवादातून राजमाता जिजाऊ कशा होत्या, ते प्रत्यक्षच रुप गौरी थोरात यांनी एकपात्री प्रयोगातून सातारकरांसमोर उतरवल्या. त्यांच्या प्रत्येक संवादाला टाळय़ाचा पाऊस पडत होता. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा दिल्या जात होत्या. सगळे सभागृह साक्षात राजमाता जिजाऊच आपल्यासमोर अवतरल्या असल्याचे पाहत त्या प्रयोगास दाद देत होते.
सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने गौरी थोरात यांच्या एकपात्री प्रयोगाचे आयोजन स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौरी थोरात याचा यथोचित सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, पंचायत समितीच्या सदस्या विद्या देवरे, ज्येष्ठ पत्रकार दीपक प्रभावळकर, हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रयोग सादर करण्यापूर्वी प्रास्ताविकात घरे दारे जळत होती…मुलबाळ मरत होती…काळ झोपेत होता..इज्जत अब्रुचे निघत होते धिंडवडे…ती जागे होती..ती शिवरायाची आई जिजाऊ होती.. अशी कविता सादर करुन गौरी थोरात यांनी प्रत्यक्ष सादरीकरणाला सुरुवात केली. यादवांचा गरुडध्वज दिमाखात फडकत होता..वैभवाचा चंद्र महाराष्ट्रावर चांदणे शिंपित होता..पण घात झाला.चंद्राला आकस्मात खळे पडले.कसे पडले, केव्हा पडले हे कोणालाच समजले नाही.महाराष्ट्रावर दुष्टचक्र आले.अर्जे, मवाली अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर धाड टाकली.देवगिरीचा राजा रामदेवरायास कैद झाली.शंकरदेव राय हा त्यांचाच मुलगा पराक्रम करुनही ठार झाले.देवगिरीचा गरुडध्वज काडकन मोडून पडला.महाराष्ट्राची द्वारका म्हणजे देवगिरी बुडाली.तरीही एक निखारा शिल्लक होता हरपाल देव.रामदेवराव यादवांचा जावई.त्यांनी प्रचंड पराक्रम करुन दिल्लीशी टक्कर दिली.परंतु हरपालदेवाला जीवंत पकडण्यात आले.मलिक कापूर या सुलतानाने हुकूम सोडला.उसकी खाल खिचकर देवगिरी के दरवाजेपर लटका दिया जाय.मग हरपालदेवाला जीवंत सोलून देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आले.देवगिरीच्या दरवाजावर यादवांचा जावई लोंबकळू लागला.देवगिरीच्या माथी गरुडध्वज फडकत असे आज फडफडत होती घाऱया आणि कावळय़ांची.कारण त्यांच्यासाठी देवगिरीच्या वेशीवर चांगली मेजवाणी.अखेरचा निखारा देवगिरीच्या वेशीवर विझत पडला.तो विझत विझत गेला तो पार विझुन गेला.महाराष्ट्राच्या स्मशानात उरली होती जीवंत प्रेत.शेवटच्या संस्कारासाठी ती घटना होती.सर्व सुलतानांनी महाराष्ट्रावर तीनशे वर्ष राज्य केलं.विजयनगर हे दक्षिणेचे रामराज्य, असा पुर्व इतिहास सांगत त्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक व इतर घटनांचा धावता आलेखच आपल्या संवादशैलीतून मांडला. त्यांचा प्रत्येक संवाद हा सभागृहातील प्रत्येकजण कानाचे द्रोण करुन डोक्यात साठवत होता. टाळय़ांचा कडकडाटातून प्रतिसाद मिळत होता. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा घुमत होत्या.वातावरण भारुन टाकले होते.
साताऱयात राहणारे प्रत्येकजण भोसलेच
यावेळी बोलताना दीपक प्रभावळकर म्हणाले, आपण चौथी, पाचवीच्या पुस्तकामध्ये जो इतिहास वाचतो. तोच आपल्याला माहिती असतो. खरे शिवाजी महाराज अजूनही कळले नाहीत. ते कळण्याकरता अशा प्रयोगांची गरज आहे. फिरोज भोसले यांनी हे आयोजन केले आहे. त्यांचे आडनाव पठाण असले तरीही ते कार्यात कुठेही कमी नाहीत. साताऱयात राहणारे प्रत्येकजण हे भोसलेच आहेत, असे त्यांनी सांगितले.
हरिष पाटणे म्हणाले, आपण सगळी महाराष्ट्र लेकर आहोत. सध्या एक घोष वाक्य घुमतय तुमच आमच नात जय जिजाऊ जय शिवराय. पहिली ज्वाला जिजाऊंनी प्रज्वलीत केली. त्या लखुजींच्या कन्या होत्या. शहाजी राजेंच्या पत्नी होत्या. शिवबांच्या आई होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारख्या महापुरुषाला जन्म दिला. शिवबा ते शिवाजी महाराज घडवले. रयतेला गुलामीतून मुक्त केले. आज प्रत्येकाच्या मनामनात घराघरात राजमाता जिजाऊ आहेत. अंधकार दुर करण्यासाठी घराघरात ज्ञानाचा दिवा पाहिजे, प्रत्येकाच्या घराघरात शिवा पाहिजे, एक जिजा पाहिजे, त्याच राजमाता जिजाऊंचे यांचे चरित्रच गौरी थोरात या मांडत आहेत, असे त्यांनी सांगितले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, राजमाता जिजाऊनी इतिहासच नव्हे तर भूगोल बदलला आहे. अलिकडे मात्र प्रत्येक महापुरुषांना जातीधर्माच्या जोखडात बांधले जात आहे. महापुरुषांचे कार्य पोहचवण्यासाठी अशा प्रयोगाची गरज आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून गौरी थोरात यांनी राज्यव्यापी व्यासपीठ उपलब्ध करुन देवू, असे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले.