प्रतिनिधी / कोल्हापूर
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श घेऊन युवक-युवतींनी वाटचाल करावी असे प्रतिपादन उद्योजक नितीन वाडीकर यांनी केले.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱया महिलांच्या सन्मान सोहळयात वाडीकर बोलत होते.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा पार्कात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासून दिवसभर जिजाऊ.छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली.
सायंकाळी हुतात्मा पार्काच्या हिरवळीवर योध्दा महिलांच्या सन्मान सोहळयाचा कार्यक्रम पार पडला.महापौर ऍड सुरमंजिरी लाटकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना उद्योजक नितीन वाडीकर म्हणाले,राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य मोठे आहे. त्यांचे कार्य समाजासाठी आदर्श आणि दिशा देणारे आहे.आजच्या युवक-युवतींनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी.यांनतर सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उद्योजक नितीन वाडीकर आणि शालन शेटे यांच्या हस्ते महापौर सुरमंजिरी लाटकर,शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कटे,कांचनताई परुळेकर यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधी,डॉ.उज्वला पत्की,श्वेता पत्की यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधी,डॉ.आशा शितोळे,उद्योजिका मनिषा वाडीकर,उद्योजिका मुग्धा देशपांडे-अकोळकर,जलतरणपटू आभा देशपांडे,सीए ऋतुजा चौगुले,सामाजिक कार्यकर्त्या कस्तुरी रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर वक्तृत्व स्पर्धेचेही बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी अरविंद देशपांडे,माणिक पाटील-चुयेकर,संजीव कुलकर्णी,राजेंद्र शिंदे उपस्थित होते. आभार शालन शेटे यांनी मानले.वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.