संत गाडगे महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण कामाचा सुळेंच्या हस्ते प्रारंभ
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांनी समता, बंधुतेचा विचार घेऊन अनेक बोर्डींग, वास्तू उभारल्या. या वास्तू आजही राजर्षी शाहूंच्या संस्कार, विचारांची आठवण करून देत आहेत. आता वास्तूंची ओळख देशाबरोबर जगाला व्हायला हवी. त्यासाठी वास्तूंना आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन त्या टुरीझम हब म्हणून नावारूपाला आणावे लागले. हे काम अस्तित्वात आणण्यासाठी आमदार, खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधींनी एकत्र आणले जाईल, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
माजी महापौर हसिना फरास व कोल्हापूर परीट समाज यांच्या वतीने अंबाबाई मंदिरजवळील संत गाडगे महाराज पुतळ्याभोवतीने केल्या जाणाऱया सुशोभिकरण कामाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी गाडगे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुशोभिकरण कामाचा प्रारंभ केला.
कोल्हापुरातील आजीच्या घरातील आठवणींना उजाळा देत सुळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर मार्मिक टिप्पणी केली. त्या म्हणाल्या, ज्या जिह्यात शाहू महाराजांनी पुरोगामी विचार रुजवले, त्या कोल्हापूर जिह्यात महाराजांच्या विचारांविरुद्ध असलेल्या विचाराच्या संघटना वाढत आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारांना वेगळ वळण लागत चालले आहे. महाराजांचे विचार जनमाणसाबरोबरच नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आपण कुठे कमी पडत आहोत का याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. याचबरोबर सावध होऊन राजर्षी शाहूंनी उभारलेले वास्तूंचे जतन करून त्यांना टुरिझम हबचा दर्जा देत त्याची महती भारत वासियांसह जगापर्यंत पोहोचवावी लागेल, असे सुळे यांनी तळमळीने सांगितले.
मालोजीराजे म्हणाले, सध्याच्या बदलत्या परिस्थितीतही सर्वांना जाणिवपुर्वक संत गाडगे महाराजांच्या पुतळ्याकडे एक स्वच्छतेचा विचार म्हणूनच पहावे लागेल. अनेकांना साफसफाईचे काम करताना लाज वाटते. पण गाडगे महाराजांनी लाज न बाळगता समाज परिसर स्वच्छतेचे काम केले आहे. आज याच कामाला विशेष महत्व आले आहे. याचा नव्या-जुन्या पिढीने गांभिर्याने विचार करून गाडगे महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत स्वच्छता कामात स्वतःला झोकून द्यावे.
माजी नगरसेवक आदिल फरास यांनी गाडगे महाराज पुतळ्याभोवतीने सुशोभिकरण करण्याची भावना सांगून या कामासाठी महापालिकेकडून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कोल्हापूर परिट समाजाचे अध्यक्ष प्रकाश भालकर, उपाध्यक्ष संदीप भालकर, सचिव उदय भालकर, संचालक शशिकांत भालकर, वसंतराव वठारकर, दीपक भालकर, दिपक लिंगम, सुरेश चौगुले, राजेंद्र यादव, दशरथ लोखंडे, दीपक म्हेतर, श्रीकांत शिंदे, दीपक लोखंडे, गजानन लिंगम, महेशकुमार खडके आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक सविता भालकर यांनी स्वागत करून आभार मानले.