प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. त्यांच्या या कार्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम दीक्षित गुरूजींनी केले, असे गौरोद्गार विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ऍड. धनंजय पठाडे यांनी काढले. विद्यापीठ शिक्षण संस्था आणि भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल आणि विद्यापीठ मराठी शाखेत दीक्षित गुरूजींना त्यांच्या 41 व्या स्मृतीदिनी आदरांजली वाहण्यात आली. तपोवन येथील दीक्षित गुरूजींच्या समाधीस्थळी शिक्षकांनी भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण केल्यानंतर चेअरमन ऍड. पठाडे यांनी पुष्पांजली वाहिली. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठ हायस्कूलची उभारणी झाली झाली. बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत, यासाठी त्यांनी सक्तीच्या, मोफत शिक्षणाची अंमलबजवणी कोल्हापूर संस्थानात केली.
विद्यापीठ हायस्कूलच्या माध्यमातून राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक विचारांना पुढे नेत दीक्षित गुरूजींनी तोफखाने गुरूजींच्या सहाय्याने ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यापीठ हायस्कूलचा आज जो वटवृक्ष झाला आहे, तो दीक्षित गुरूजींच्या निस्सिम त्यागामुळेच आहे, असेही चेअरमन ऍड. पठाडे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विजय झंवर-नगरशेठ, पृथ्वीराज पठाडे, अजय चिले, प्रशासन अधिकारी प्रदीप मगदूम यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
विद्यापीठ हायस्कूलमध्येही दीक्षित गुरूजींना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांच्या हस्ते दीक्षित गुरूजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. एस. बी. सोनार यांनी दीक्षित गुरूजींच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, उपप्राचार्य के. पी. वायफळकर, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी आदींसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.