प्रतिनिधी / कोल्हापूर
नर्सरी बाग,सिध्दार्थनगर येथील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहात पार पडला.
नर्सरी बाग,सिध्दार्थ नगर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे समाधीस्थळ उभारण्यात आले आहे.शाहूंच्या समाधीची इच्छापूर्ती जवळपास शंभर वर्षांनी पूर्ण झाली आहे. यानिमिमित्त महापालिकेच्या वतीने या समाधीस्थळ लोकार्पण सोहळा भव्यदिव्य करण्यात आला.16 जानेवारीपासून कोल्हापूरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर समाधीस्थळ परिसरात पोवाडे,शाहिरीचा कार्यक्रम सुरु होता.शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे,शाहूंनी बांधलेली वसतीगृहे,इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तर सर्व शहरात समाधीस्थळाला अभिवादन करणारे फलक उभारण्यात आले होते.
रविवारी सकाळी खा.शरद पवार यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री बाळासासेब थोरात,श्रीमंत शाहू महाराज छत्रपती,महापौर ऍड सूरमंजिरी लाटकर,पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,आरोग्य व अन्न औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती,खासदार धैर्यशील माने, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,आमदार चंद्रकांत जाधव,आमदार राजूबाबा आवळे,आमदार ऋतुराज पाटील,आमदार राजेश पाटील,जिल्हाधिकारी दौलत देसाई,आयुक्त डॉ.मलिन्नाथ कलशेटी यांच्या उपस्थितीत कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी शाहू महाराजांच्या जय घोषाने परिसर दुमदुमला.शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी शाहूंच्या समाधीस्थळावर पुष्प वाहून अभिवादन केले.
समाधीस्थळावर गर्दी-
नर्सरी बागेतील समाधीस्थळावर सकाळपासून गर्दी झाली होती.शाहिरी,पोवाडय़ांतून शाहुंच्या कार्याची महत्ती सांगितली जात होती.तसेच मर्दानी खेळांने गर्दीचे लक्ष वेधून घेतले.लोकार्पण सोहळयानिमित्त कसबा बावडय़ातील शाहू जन्मस्थळ ते समाधीस्थळ या मार्गावर समता रॅली काढण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शाहू सलोखा मंचच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समाधीस्थळावर शाहू अनुययायांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती.
समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा मोबाईल स्टेटसवर
शाहू समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला.या समाधीस्थळाचे स्टेटस कोल्हापूरकरांनी मोबाईलवर स्टेटस ठेवले होते.यामुळे शहरांसह इंटरनेटही शाहूमय झाले होते.