- बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य
ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राजस्थान सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत 25 मार्चपासून राजस्थानमध्ये बाहेरुन येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना 72 तासांपूर्वीचे आरटी – पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
यासोबतच 22 मार्चपासून म्हणजेच आज पासून रात्री दहा वाजल्यापासून राज्यातील सर्व नगर निकाय क्षेत्रातील बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजमेर, भिलवाडा, जयपूर, जोधपूर कोटा उदयपूर, सागवाडा आणि कुशलगडमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये मागील 24 तासात 476 नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 86 रुग्ण एकट्या जयपूर मधील आहेत. कालच्या दिवशी 2 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण आकडा 3,25,424 वर पोहोचला आहे. सद्य स्थितीत 3,585 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 2,798 जणांनी आपला जीव गमावला आहे.