ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थान सरकार राज्यात मास्क लावणे बंधनकारक करण्याचा विचार करत असून लवकरच याबाबत कायदा करणार आहे. सरकार विधानसभेच्या येणाऱ्या सत्रात याबाबत विधेयक मांडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली.
ते म्हणाले, राज्य सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. जो पर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क लावणे, दोन मीटरचे अंतर राखणे आणि सतत हात स्वच्छ धुणे यासारखे उपाय करून कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्न करता येईल.
राज्यात 2 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आलेल्या ‘नो मास्क नो एंट्री- कोरोना विरोधात जन आंदोलन’ अभियानाच्या यशस्वीतेबाबत जिल्हाधिकारी, कॉलेजचे प्राचार्य, नगर परिषदेचे अधिकारी आदी सोबत संवाद करत होते.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, आतषबाजीवाल्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदा दिवाळीत फटाके न उडविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.