दिल्लीत बैठकांचे सत्र – काँग्रेस नेत्यांचे लॉबिंग सुरू
वृत्तसंस्था / जयपूर
पंजाबनंतर आता राजस्थानात काँग्रेस पक्षश्रेष्ठी सरकार आणि संघटनेत बदल करण्याची तयारी करत आहेत. परिवर्तनापूर्वी काँग्रेसमध्ये दिल्लीपासून जयपूरपर्यंत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. दिल्लीत या बदलांचा आराखडा तयार करण्यावरून बैठकांचे सत्र सुरू आहे. सचिन पायलट शुक्रवारपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांची भेट घेतली आहे. या भेटीकडे राजस्थानात नेतृत्व परिवर्तनापूर्वीची तयारी म्हणून पाहण्यात येत आहे.
1 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रस्तावित जयपूर दौऱयात मंत्री, आमदारांची बैठक होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनीही शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली आहे. महसूलमंत्री हरीश चौधरी मागील काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्याचे काँग्रेस पक्षाचे अजय माकन यांची राजस्थानवरून चर्चा झाली आहे. काँग्रेस नेतृत्वाने राजस्थानात परिवर्तनाच्या ब्ल्यू प्रिंटला अंतिम स्वरुप देण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑक्टोबर महिन्यात या परिवर्तनाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळ फेरबदलाने याची सुरुवात होईल. त्यानंतर संघटनेतील रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात येतील. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटातील राजकीय संघर्ष अद्याप सुरू आहे. याचदरम्यान सचिन पायलट प्रलंबित मागण्यांवर लवकर तोडगा काढला जावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पायलट गटाच्या मागण्यांकरता निर्माण समितीत सामील के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांनी स्वतःच्या शिफारसी काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी ‘ऍक्शन टेकन’ सूत्रावर चर्चा केली आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडून हिरवा कंदील दर्शविला जाताच राजस्थानात बदल केले जाणार आहेत.
दिल्लीत लॉबिंग
राजस्थानात सत्ता-संघटनेत फेरबदलापूर्वी दिल्लीत लॉबिंगला वेग आला आहे. अनेक मंत्र्यांनी दिल्लीत धाव घेत स्वतःच्या राजकीय गॉडफादरांची भेट घेत कानोसा घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. गेहलोत सरकारमध्ये सामील अनेक मंत्री आता गच्छंतीपासून वाचण्यासाठी लॉबिंग करत आहेत. तर काही आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत.
दिग्विजय सिंह दौऱयावर
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह 1 ऑक्टोबर रोजी जयपूरच्या दौऱयावर असतील. जयपूरमध्ये मंत्री, आमदार आणि नेत्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्य प्रभारी अजय माकन यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर दिग्विजय यांच्या प्रस्तावित बैठकीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दिग्विजय हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.