गेहलोत-पायलट संघर्ष शिगेला, पायलट समर्थक आमदार हरियाणात, भाजपशी संपर्कात असल्याचे संकेत
@ जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँगेस सरकारवर अस्थिरतेची तलवार लटकू लागली असल्याचे दिसत आहे. गेहलोत आणि त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यातील मतभेद विकोपाला गेले आहेत. पायलट समर्थक आमदार सध्या हरियाणातील गुरूग्राम येथील अतिथिगृहात वास्तव्यास असून पायटल यांनी भाजपशी संपर्क केल्याचे वृत्त आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा अद्याप मिळू शकलेला नाही.
पायलट समर्थक आमदार शनिवारीच दिल्लीत आले आहेत. त्यांच्या दिल्लीतील आगमनानंतर राजस्थानची राजधानी जयपूर येथे हालचाली गतीमान झाल्या. मुख्यमंत्री गेहलोत यांनी रविवारी रात्री 9 वाजता सर्व आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला किती आमदार उपस्थित होते याची अधिकृत माहिती दिली गेली नाही. तसेच बैठकीत कोणतीही चर्चा झाली याविषयीही सांगण्यात आले नाही. मात्र, संकटाचे ढग अद्याप कायम आहेत. रविवारी संध्याकाळी पायलट यांनी काही भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र यासंबंधी दोन्ही बाजूंकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आले नाही.
नोटीसीमुळे वातावरण तापले
राजस्थानच्या विशेष कृती दलाने पायलट यांच्यासह काही आमदारांना सरकार अस्थिर करण्याचा कट केल्याबद्दल नोटीसा पाठविल्या आहेत. शनिवारी दोन व्यक्तींना अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या महितीनुसार या नोटीसा पाठविल्याचे सांगण्यात आले. मात्र पायलट यांना हा अपमान वाटला आणि त्यांनी आपल्या आमदारांची जमवाजमव सुरू गेली असे बोलले जाते.
परस्परविरोधी दावे
सचिन पायलट गटाने आपल्या बाजूला 24 आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवाय काही अपक्ष आमदारही आपले समर्थक असल्याचे म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्री गटाने हा दावा फेटाळला असून बहुसंख्य आमदार पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले असून राज्य सरकार स्थिर आहे व ते आपला कालावधी पूर्ण करेल, असा दावा करत पायलट गटाला आव्हान दिले.
भाजपवर आरोप
भाजप आपले सरकार अस्थिर करण्यासाठी आमदारांच्या खरेदीचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गेहलोत यांनी केला. फुटण्याची इच्छा असणाऱया प्रत्येक आमदाराला आधीच प्रत्येकी 10 कोटी रूपये देण्यात आले असून फुटल्यानंतर आणखी 15 कोटी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, असे गेहलोत यांचे म्हणणे आहे. काँगेसच्या केंद्रीय नेत्यांनीही भाजपवर शरसंधान केले.
अहमद पटेल यांची भेट
शनिवारी रात्री उशीरा पायलट यांनी काँगेस नेते आणि सोनिया गांधी यांचे निकवटवर्तीय अहमद पटेल यांची भेट घेऊन राजस्थानातील संघर्ष त्यांच्या कानावर घातल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री पायलट यांचा सातत्याने पाणउतारा करीत असून त्यांना प्रदेश काँगेस अध्यक्षपदावरून हटविण्याचे त्यांचे कारस्थान आहे, असा आरोप पायलट समर्थक आमदारांनी पत्रकारांसामोर केला.
भाजपकडून आरोपांचा इन्कार
राजस्थान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, हा आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. अंतर्गत मतभेदांमुळे काँगेस सरकार अस्थिर झाले असून पक्ष एकत्रित ठेवण्यात मुख्यमंत्री व काँगेसचे केंद्रीय नेतृत्व अपयशी ठरले. हे अपयश झाकण्यासाठी भाजपवर वृथा आरोप करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन नड्डांनी केले.
काँगेस केव्हा जागी होणार ?
राजस्थानानील संकटामुळे आपण व्यथित झालो आहोत. परिस्थितीकडे केव्हा लक्ष देणार? तबेल्यातील घोडे पळून गेल्यानंतर आपण तबेला बंद करणार आहोत का? अशी खोचक पृच्छा काँगेस नेते कपिल सिबल यांनी केली आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांनी पक्षनेतृत्वालाच या संकटासाठी जबाबदार धरल्याचे या प्रश्नांवरून मानले जात आहे. पक्षश्रेष्ठींनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
राजस्थान विधानसभेतील पक्षीय बलाबल
एकंदर जागा 200
काँगेस 106
भाजप 72
अपक्ष व इतर 22
राजकीय हालचाली गतीमान…
सचिन पायलट यांचा 24 काँगेस आमदारांच्या पाठिंब्याचा दावा
मुख्यमंत्री गटाच्या वतीने राज्य सरकारला धोका नसल्याचा दावा
हा काँगेस पक्षातीलच अतंर्गत कलह असल्याचे भाजपचे वक्तव्य
राजस्थानात मध्यप्रदेची पुनरावृत्ती होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे