पाण्याचे झरे किंवा कारंजे आपल्या नित्य परिचयाचे आहेत. तथापि, राजस्थानातील वाळवंटात नुकताच एक नैसर्गिक चमत्कार पहावयास मिळाला आहे. तेथे चक्क वाळूचे कारंजे आणि झरे निर्माण झाले आहेत. अर्थात यात काही दैवी चमत्कार वगैरे नसून हा निसर्गाचाच एक आविष्कार आहे.
राजस्थानच्या बारमेर जिल्हय़ात महाबार नामक एका स्थानी हे दृश्य दिसून आले. येथे उन्हाळय़ाच्या दिवसात मोठय़ा वेगाने वारे वाहतात. उन्हामुळे वाळू तापून तिच्या लगतची हवा विरळ बनते. त्यामुळे ती पोकळी भरून काढण्यासाठी हवेचे झोत जमिनीकडे येऊ लागतात. या प्रक्रियेत वाळवंटातील वाळू वर उचलली जाते आणि वाळूचा कारंजा उडत असल्याचे दृश्य दिसते. काही ठिकाणी याच प्रक्रियेमुळे वाळू जमिनीवरून झऱयासारखी वाहाताना दिसते. प्रत्येक उन्हाळय़ात हे दृश्य दिसतेच असे नाही. यंदा येथे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने निसर्गाची ही किमया लोकांना पाहता आली. वाळूच्या या कारंज्यांचे आणि झऱयांचे व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर प्रसारित झाले. यावेळी उन्हाळय़ात वाळवंटातील तापमान नेहमीपेक्षा थोडे अधिक होते. त्यामुळे अशी दृश्ये दिसली, असे तज्ञांचे मत आहे. वाळूचे कण सुटे सुटे असल्याने अशी दृश्ये वाळवंटात दिसून येतात.