असंतोष नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाची बहुचर्चित पुनर्रचना रविवारी पार पडली आहे. नव्या मंत्र्यांना राज्यपाल कलराज मिश्र यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळात 11 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्री असे एकंदर 15 मंत्री आहेत. या पुनर्रचनेमुळे मतभेदांना मूठमाती मिळाली असून आता राज्यातील काँगेस एकसंध झाली असल्याचा दावा गेहलोत यांनी केला.
नव्या मंत्रिमंडळात पूर्वीच्या तीन राज्यमंत्र्यांना कॅबिनेट दर्जा देऊन त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. ममता भूपेष, भजनलाल यादव जातव आणि टिकराम जुल्ली अशी त्यांची नावे आहेत. तर विश्वेंद्रसिंग आणि रमेश मीना यांना गेल्या वर्षीच मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय हेमाराम चौधरी, महेंद्रजीतसिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, गोविंदराम मेघवाल आणि शकुंतला रावत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.
झहिदा, ब्रिजेंद्रसिंग ओला, राजेंद्र गुधा आणि मुरारी लाल मीना या चार नेत्यांना राज्यमंत्री बनिवण्यात आले. पूर्वीच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह 15 जणांना कायम ठेवण्यात आले आहे. या पुनर्रचनेमुळे आता गेहलोत मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह 30 झाली आहे.
या मंत्र्यांमध्ये 19 कॅबिनेट मंत्री, 10 राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. राजस्थान मंत्रिमंडळात मुख्यमंत्री धरुन 30 मंत्र्यांना स्थान मिळू शकते. अशा प्रकारे आता मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झालेला असून आणखी मंत्री नियुक्त करण्याची शक्यता नाहीशी झालेली आहे. मंत्र्यांचे खातेवाटप नंतर होणार आहे.
पायलट समाधानी
नव्या मंत्रिमंडळावर नाराज नेते सचिन पायलट यांनी समाधान व्यक्त केले. डिसेंबर 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पुन्हा विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री गेहलोत यांनी व्यक्त केला.
असंतोष कायम
नव्या मंत्रिमंडळात पायलट गटाचे समाधान करण्यात आले असले तरी अनेक जुन्या आणि अधिक काळ निवडून आलेल्या आमदारांना संधी न मिळाल्याने असंतोष आहे. काही आमदारांनी उघडपणे तो व्यक्त केला आहे. त्यामुळे पुनर्रचनेनंतरही धुसफूस कायम राहील, अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त होते.