ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बुधवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. पहिल्या पेपरलेस अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी स्पेशल कोविड पॅकेजची घोषणा केली आहे.
या पॅकेजच्या अंतर्गत कोरोना रुग्णांना आर्थिक मदत केली जाणार आहे. यासोबतच गहलोत यांनी स्वयंरोजगारासाठी 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाणार आहे. तसेच राज्यात इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजना देखील सुरू केली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनामुळे अर्थव्यवस्था हादरली आहे, म्हणून वर्षभरात अधिकाधिक संसाधने वाढवण्यावर जोर दिला जाणार आहे. राज्य सरकारने ‘राईट टू हेल्थ’ विधेयक आणले आहे आणि पुढच्या वर्षी सरकार 3,500 कोटी रुपये खर्च करून युनिव्हर्सल हेल्थ केअर लागू करणार आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे.
- पुढच्या वर्षी कृषी अर्थसंकल्प
यावेळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुढील वर्षी कृषी अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी मिनी फूड पार्क तयार केले जाणार आहेत. तर आगामी 3 वर्षात 1 हजार किसान सेवा केंद्र तयार केले जाणार आहेत. यासह 500 शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार आहेत.