ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानातील गेहलोत सरकारमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले असले तरी भाजपच्या नव्या खेळीने त्यांची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
उद्यापासून (शुक्रवार) राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात हा अविश्वासदर्शक ठराव आणण्याची घोषणा विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपच्या आमदारांची आज भाजपमध्ये बैठक झाली. यावेळी कोरोना संकट, लॉकडाऊनवर चर्चा झाली. तसेच या बैठकीत गेहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट गटाचे आमदार सहभागी होणार आहेत.