ऑनलाईन टीम / बुंदी :
राजस्थानमधील बुंदीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. बुंदीमधील चंबळ नदी पार करत असताना एक बोट पलटली आहे. या बोटीमध्ये 30 जण होते. यामधील 24 लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहितीनुसार, गोठला कलाच्याजवळ कमलेश्वर धामला जात असताना ही घटना झाली. यादरम्यान, अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
या बोटीत या 30 लोकांसह 14 मोटरसायकलही होत्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात केली.