कडक निर्बंधांमुळे सौदी अरेबियात कोरोनावर नियंत्रण : मसुरे कावावाडी येथील गणेश पेडणेकरने दिली माहिती
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
सौदी अरेबिया म्हणजे जगातील एक शिस्तीचा देश. इथे आदेश महत्त्वाचा आणि आदेश मोडणाऱयाला शिक्षा ही मोठीच असते. यामुळे 24 तास संचारबंदी म्हणजे सर्वत्र लॉकडाऊन. इथे कायदा मोडणारा लाखात एकही दिसत नाही. येथील राजाचा आदेश हा प्रमाण मानला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदीत एवढी शिस्त आहे की, पूर्ण देशात आतापर्यंत फक्त 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे ‘कोरोना’ची भीती इतकी आहे की, मालवणी माणसाचा जीव व्याकुळ होतो. तशीच आमची स्थिती आहे, अशी माहिती मालवण मसुरे-कावावाडी येथील गणेश सुधाकर पेडणेकर याने दिली.
गणेश पेडणेकर हा गेली आठ वर्षे सौदी अरेबियातील दम्माम या औद्योगिक शहरात सौदी अरेबिया या कंपनीत क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. गणेश याने तेथूनच ‘तरुण भारत’शी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्यासोबत महाराष्ट्रातील एक आणि इतर राज्यातील चौघे असे एकूण पाचजण राहतात. गेले पंधरा दिवस गणेश घरातच लॉकडाऊन आहे. त्याच्या कंपनीचे कामही पूर्णत: बंद असून त्यांना आपल्या घरीच राहण्याच्या सूचना कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.
सौदीत शिस्त व आदेश पाळणे यामुळे कोरोनाने हात-पाय पसरले नाहीत. सुरुवातीचे पंधरा दिवस 7 ते 3 अशी संचारबंदी होती. नंतरच्या पंधरा दिवसापासून ते अद्यापपर्यंत 24 तास संचारबंदी आहे. येथील संचारबंदी म्हणजे पूर्णत: बंद. शंभर टक्के सर्व लॉकडाऊन. ना मॉल उघडे, ना दुकाने, ना हॉटेल्स की कुठची कंपनी की शाळा-कॉलेज. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. येथील संरक्षित रुग्णांची संख्या तीन हजारच्या आसपास आहे. फक्तखबरदारी घेतल्यामुळेच कोरोना रुग्ण नगण्य आहेत. आपल्या भारतातही अशीच काळजी घेतली तर आपणही लवकरच कोरोनामुक्त होऊ, असे गणेश सांगतो.
पोलिसांचे काम करतात सीसीटीव्ही
सौदी अरेबियात पूर्णत: लॉकडाऊन आहे. रस्त्यावर पोलीस फिरताना दिसणार नाहीत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने एखादी वाहन रस्त्यावर दिसली तरी तिची लगेच नोंद होते. संचारबंदी नियम जर त्या वाहनाने मोडला असेल तर त्या वाहन मालकाच्या नावाने दंडाची नोटीस घरी आलेली असते. संचारबंदीच्या काळात येथील रस्त्यावर चालणे हादेखील गुन्हा असून त्यासाठी सुमारे दीड लाखाच्या घरात दंड आकारला जातो. अशा कडक नियमामुळे येथे शहर किंवा देश पूर्णत: लॉकडाऊन असतो. म्हणूनच येथे प्रादुर्भाव झालेला दिसत नाही. इथे दळणवळणही पूर्णत: बंद आहे. येथील सरकारने एक ऍप बनवले असून येथील नागरिकांना या ऍपच्या सहाय्याने मोबाईलवर सूचना दिल्या जातात. यामध्ये संचारबंदी कालावधी, मास्क वापरणे, सॅनिटाझजर वापरणे अशा सर्व सूचना केल्या जातात. शासनाच्या व्यतिरिक्त कोणतेही आदेश निघत नाहीत.
सौदी अरेबियात सुरक्षितता असली तरी आमच्या मनात भीती कायम आहे. इटली, अमेरिका यांसारख्या मोठय़ा देशांमध्ये ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या पाहता जीव घाबरून जातो. आम्ही बाकी शूर असतो. पण आजार झाला की हातपाय गाळतो. केव्हा केव्हा मनाकडे असाही विचार येतो की गडय़ा आपला गाव बरा. सौदीमध्ये सर्वत्र सरासरी नोकरीच्या पॅकेज असल्यामुळे आर्थिक असे नुकसान होणार नसले तरी काळजी मात्र लागून राहिली आहे. येथील अर्थव्यवस्था मजबूत असल्याने आणि येथील प्रशासन या कालावधीत प्रत्येक दिवसागणिक सर्व सूचना करत असल्याने अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार नसल्याचा अंदाज असल्याचेही गणेश नमूद करतो. भारतात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या उपाययोजनांचेही सौदीत कौतुक होत असल्याचे त्याने सांगितले.
प्रशासनाकडूनच अधिकृत माहिती
सौदीमध्ये मुलांच्या परीक्षा कोरोनाचा प्रसार होण्याअगोदरच पूर्ण झाल्या असून आता पुढील अभ्यास घरीच नेटवरून सुरू झाला आहे. एखाद्याला इमर्जन्सी वैद्यकीय किंवा महत्वाच्या कारणासाठी संचारबंदी कालावधीमध्ये बाहेर पडायचे असेल तर त्याला येथील प्रशासनाचा पास इंटरनेटवरून बनवावा लागतो. येथील यंत्रणेला जर त्या कारणाची खात्री पटली तरच त्या व्यक्तीला बाहेर पडता येते. तसेच इथे दम्माम शहरात एकही न्यूज चॅनेल नाही. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती किंवा मनाला वाटेल अशी कोणतीही बातमी आपल्याला मिळत नाही. ज्या काही सूचना असतील त्या अधिकृत प्रशासनाकडून मिळतात, असेही त्याने नमूद केले.
घरी राहा, सुरक्षित राहा…
रोज आम्ही सिंधुदुर्ग जिह्यातील अपडेट घेत असतो. माझी भारतीयांना विनंती आहे की, ‘घरी राहा, सुरक्षित राहा…’ माझ्यासोबत संपत पवार (सातारा), अनिरुद्ध शिंदे (परभणी), मयंक राठोड, अनिल सिंग (उत्तर प्रदेश) आहेत. या बंदी कालावधीत एकत्रपणे राहत असून प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत, असे गणेशने सांगितले.