प्रतिनिधी/ रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरूवारी जिल्ह्य़ाभर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने धुमशान घातले. जिह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. राजापूर शहराला पुराचा वेढा पडला तर संगमेश्वर तालुक्यात पुरसदृश स्थिती निर्माण झाली. महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पाणी व दरडी आल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. जिह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून या वादळाचा धोका कायम आहे. दापोली-केळशी किनाऱयावरून वादळ पुढे जाण्याची शक्यता असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी रात्रीपासून संततधार पावसाने राजापूर तालुक्याला तडाखा दिला. अर्जुनासह कोदवलीकडून वाहणाऱया नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने राजापूर शहराला पुराचा वेढा पडला होता. दुपारपर्यंत शिवपुतळ्यापर्यंत पुराचे पाणी साचले होते. तालुक्याच्या ग्रामीण भागालाही याचा दणका बसला. ओणी-अणुस्कुरा मार्गावर सौंदळ रेल्वेस्टेशनजवळ पुराचे पाणी मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. रायपाटण गांगणवाडीत पुराचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरले. तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. 2 दिवसापूर्वी वाटुळ येथे एका घरावर वीज पडून नुकसान झाले. तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. शहराला पुराचा वेढा पडल्याने धास्तावलेल्या व्यापाऱयांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला होता. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली होती. बाजारपेठेकडे येणारे सर्व मार्ग पाण्याखाली गेले होते. शहरातील शिवाजी पथपासून शिळ गोठणे दोनिवडेकडील संपूर्ण मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील सर्व वाहतूक बंद होती. कोंडेतड पुलाकडे जाणारा मार्गही पाण्याखाली होता. एसटी सेवा बंद असल्याने शहरात आलेल्या ग्रामीण भागातील जनतेला राजापूर डेपोकडे जाताना पायपीट करावी लागली.
अर्जुना नदीचे पुराचे पाणी रायपाटण गांगणवाडीतील काही घरात शिरले होते. नदीलगतच्या भातशेतीलाही याचा मोठा फटका बसला. त्यामुळे तेथील ग्रामस्थ तणावाखाली होते. पुणे, कोल्हापूरकडे जाणाऱया गाडय़ा उशीराने रवाना झाल्या होत्या. चिखलगाव येथे पाच घरे ,पाच गोठे व एका दुकानाचे अंशतः नुकसान झाले. गिरमादेवी कोंड येथे घराची पडवी पडून नुकसान झाले. तालुक्याला आर्थिक फटका बसला असताना जीवितहानी मात्र कुठे झाल्याची नोंद झाली नाही.
संगमेश्वर बाजारपेठांमध्ये पुरसदृश स्थिती
सलग 3 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा महामार्गालाही फटका बसला. गटारांची अर्धवट कामे, मातीचे ढीक यामुळे महामार्गावर पाणी साचले होते. सलगच्या पावसामुळे सोनवी, शास्त्राr व बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नद्यांचे पाणी सखल भागातील शेतीमध्ये घुसले आहे. त्यामुळे तेथील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. संगमेश्वर, माखजन, फुणगूस बाजारपेठांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठांतील काही भागांमध्ये पाणी भरले होते.
कापलेली भातशेती वाहून गेली
सोनगिरी, कुरधुंडा, गावमळा, बावनदी आदी भागातील पिकलेली भाते पाण्यावर तरंगत होती. तयार भातशेती तरंगताना पाहून शेतकऱयांच्या डोळय़ात पाणी आले. काही भागात कापलेली भातशेती वाहून गेली. अनेक शेतकऱयांचा भर पावसात भातशेती वाचवण्यासाठी आटापीटा सुरुच होता.