सीगल पक्षांच्या आगमनाने किनारपट्टी गजबजली
वार्ताहर/ राजापूर
तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर सीगल पक्षांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. दरवर्षी थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचे अंतर कापून येणाऱया या परदेशी पाहुण्यांच्या किलबिलाटाने किनारपट्टीचा भाग गजबजून गेला असून सीगल पक्षांच्या वास्तव्यामुळे समुद्रकिनारपट्टीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली आहे. मात्र यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत पक्षांची संख्या घटल्याचे पक्षीप्रेमी धनंजय मराठे यांनी सांगितले.
सहय़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या राजापूर तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. एका बाजूला सहय़ाद्रीच्या डोंगररांगा तर दुसऱया बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनाऱयामुळे तालुक्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. राजापूर तालुक्यात असलेल्या विपूल वनसंपदेमुळे या ठिकाणी दुर्मीळ प्रजातीच्या पशु-पक्षांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात असल्याचे आढळते. गेल्या काही वर्षात समुद्र कासवांची दुर्मीळ प्रजाती म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडीही तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवर आढळून आली आहेत. अशातच दरवर्षी थंडीच्या हंगामात किनारपट्टीवर दाखल होणाऱया सीगल पक्षांमुळेही कोकण किनारपट्टीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
परदेशी पाहुणे म्हणून ओळखले जाणारे सीगल पक्षी गेल्या काही वर्षात तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर वास्तव्याला येत आहेत. साधारणपणे 15 डिसेंबरनंतर या पक्षांचे आगमन होते. त्यानुसार यावर्षी पश्चिम किनारपट्टीवर सीगल पक्षांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. सीगल पक्षाची चोच लालभडक, लाल पाट, पांढरे शुभ्र पिसांचे आकर्षक आणि देखणे शरीर असेत. थंडीच्या कालावधीमध्ये मुबलक खाद्य आणि समागम यासाठी अनुकूल असलेल्या प्रदेशामध्ये हे पक्षी स्थलांतरित होतात. समागमानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी परततात. स्थलांतरित होणारे हे पक्षी सुमारे पंधरा हजार किलोमीटरचे अंतर साधारणतः 3 महिन्यात ताशी 20 ते 25 किलोमीटरच्या वेगाने कापतात. सद्यस्थितीत राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर सीगल पक्षांचे वास्तव असल्याने किनारपट्टीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. या पक्षांना पाहण्यासाठी पक्षीपेमीही भेट देत आहेत.