वार्ताहर/ राजापूर
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहिर झालेल्या लॉकडाऊनमध्ये रिक्षा व्यवसाय बंद असल्याने पुरता आर्थिक संकटात सापडलेल्या राजापूरातील रिक्षा व्यावसायिकांनी फाटके कपडे व पायात तुटक्या चप्पल घालून अनोखे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘आमचे तिन चाकी सरकार आहे असे अभिमानाने सांगणाऱया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपासमारीने आणि आर्थिक संकटाने बेजार झालेल्या तीन चाकी रिक्षा व्यावसायिकांकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी भाजता तालुका अध्यक्ष व राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटनचे अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली. याप्रसंगी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन तथा स्मरणपत्र संघटनेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार अशोक शेळके यांच्याकडे दिले. याबाबत ठोस निर्णय व कार्यवाही झाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी शासनाच्या विरोधात राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडू असा ईशारा देण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीव सर्वत्र जाहिर झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिक रिक्षा बंद असल्याने पुरता आर्थिक संकटात आला आहे. कौटुंबीक उपासमारी होत असून बँकाकडून हप्ते थकल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी या रिक्षा व्यावसायिकांना देखील पॅकेज द्यावे या मागणीचे निवेदन यापुर्वी 13 एप्रिल रोजी देण्यात आले होते. मात्र या निवेदनावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने बुधवारी पुन्हा एकदा राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने फाटके कपडे व तुटक्या चप्पल घालून अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
सोशल डिस्टंड व नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले. अभिजीत गुरव यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा व्यावसायिकांनी राजापूर तहसीलदार कार्यालयात येऊन निवासी नायब तहसीलदारांना मागील निवेदनावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र दिले. यावर जर का शासनाने सहानभूतीपूर्वक विचार केला नाही तर मात्र या आंदोलनाचे लोण जिल्हय़ात पसरेल व 15 ऑगस्ट रोजी सर्व रिक्षा चालक कुटुंबासह राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडतील असा ईशारा दिला आहे. याप्रसंगी संतोष सातोसे, संजय ओगले, मेहमुद उर्फ वधू खलिफे आदींसह रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते.