वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यामध्ये आगामी काळात भेडसावणाऱया पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून तीनशेहून अधिक बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये संभाव्य पाणीटंचाईमध्ये उपयुक्त ठरणारा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्यासाठी होणारी वणवण काही अंशी थांबणार आहे.
मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणी टंचाईला सामारे जावे लागते. यावर्षी उशीरापर्यंत पाऊस लागत होता. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उशीरा पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता आहे. तरीही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून पंचायत समितीतर्फे तालुक्यामध्ये गावा-गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा यानुसार तालुक्यातील 101 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 1 हजारहून अधिक बंधारे बांधण्यात येणार आहेत.
पंचायत समितीचे सभापती प्रमिला कानडे, उपसभापती उन्नती वाघरे, गटविकास अधिकारी सागर पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दीष्टपूर्तीकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एक पाऊल पुढे टाकले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासन आदींच्या सहभाग आणि श्रमदानातून आजपर्यंत तीनशेहून अधिक बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. बंधारे बांधण्याचे उर्वरीत उद्दीष्टाची पूर्ती करण्याच्यादृष्टीने वाटचाल सुरू असून गावोगावी लोसहभाग आणि श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बंधाऱयांमध्ये मोठय़ाप्रमाणात पाणीसाठा झाला असून तो भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. त्यातून एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. त्यातच रब्बी हंगामामध्ये गावोगावी करण्यात येणाऱया शेतीसाठीही या पाण्याचा उपयोग होणार आहे.