स्टॅण्डवर उभ्या असलेल्या रिक्षा.
वार्ताहर/ राजापूर
सुमारे 2 महिन्यांपासून असलेले लॉकडाऊन आणि गेले पाच दिवस व्यापाऱयांनी स्वयंस्फूर्तीने पाळलेल्या बंदनंतर शनिवारपासून राजापूर बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत दिवसभर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळाली. दरम्यान 2 महिने ओस पडलेले रिक्षा स्टॅण्डही गजबजलेले दिसत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राजापूर बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेले 2 महिन्याहून अधिक काळ बंद ठेवण्यात आली होती. राजापूर तालुका सेफ झोनमध्ये असल्याने बाजारपेठेतील दुकाने टप्प्या-टप्प्याने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच दरम्यान विखारे-गोठणे गावात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने सुरक्षितता म्हणून सोमवारपासून 5 दिवस मेडिकल दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच जिल्हय़ातील दुकाने उघडण्यास तसेच एसटी व खासगी रिक्षा वाहतुकीला काही निर्बंधांवर परवानगी देण्यात आल्याने शुक्रवारपासून जिल्हय़ातील अनेक भागातील बाजारपेठा सुरू झाल्या होत्या. मात्र राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱयांनी पाच दिवसाचा बंद यशस्वी करत शनिवारपासून बाजारपेठ सुरू केली. शनिवारी बाजारपेठेतील बहुतांश दुकाने उघडली होती. त्यामुळे खरेदीसाठीही ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागात अद्यापही एसटी बससेवा सुरू नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक मात्र बाजारपेठेकडे अद्याप फिरकलेले नाहीत. दरम्यान राजापुरात शनिवारपासून रिक्षा वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे गेले 2 महिने ओस पडलेले रिक्षा स्टॅण्ड रिक्षांच्या वर्दळीमुळे गजबजलेले दिसत होते.