वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील परिसरात सध्या गेल्या काही दिवसांपासून छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा ची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आली असताना विद्यमान सत्ताधारी आ. महादेवराव महाडिक गट व विरोधी ना. बंटी पाटील गट यांनी आपापल्या परीने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीना जोर दिला असून प्रचाराची गुप्त यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी कुंभोज व परिसरात मोठ्या प्रमाणात मतदान व सभासद असून सदर भागातील पडणाऱ्या मतदानावर कारखान्याची सत्ता स्थापन होते. सदर भागातून मोठ्या प्रमाणात ऊस कसबा बावडा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात जात असल्याने यावेळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात सभासदांचे हित जोपासण्याचे काम चालू आहे. परिणामी संचालक वर्ग चेअरमन कर्मचारी आदींच्या माध्यमातून तसेच काही गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून सभासदांच्या गाठीभेटी आपापल्या नेत्याचे कारखाना संदर्भातील आचार-विचार सभासदांना पटवून देण्याचे काम काही व्यक्तींच्या कडून केली जात आहे. तसेच कारखाना सभासद व गावातील आपापल्या गटातील पुढाऱ्यांच्या वाढदिवस ,मयत, कार्यक्रमासाठी दोन्ही गटातील नेत्यांची उपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
यावर्षीची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार होणार याची चर्चा मात्र ग्रामीण भागात जोर धरत आहे, गेल्या अनेक वर्षापासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाने कुंभोज व परिसरातील सभासदांमध्ये आपला संपर्क चांगल्या पद्धतीने निर्माण केला आहे. परिणामी नरंदे कुंभोज भेंडवडे येथे कारखाना सभासद संख्याबळ जास्त आहे, सभासद जास्त असणाऱ्या गावात वेगवेगळ्या गटातील उमेदवारी देऊन चेअरमनपदाची ही संधी बऱ्याच वेळा दिली आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही या भागात लक्ष दिल्याने मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक प्रणित छत्रपती शाहू आघाडीच्या विरोधात ना.बंटी पाटील गटाने मोठी ताकद लावली होती. परिणामी त्यावेळी त्यांचा अल्पमतात पराभव झाला होता, सदर पराभवाला न खचता सदर गटाच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी या वर्षी मोठी कंबर कसली असून कारखाना सभासदाच्या अडीअडचणी, आरोग्यसेवा, कारखाना संदर्भातील अडीअडचणी समजावून घेण्यासाठी नेते व कार्यकर्ते सभासदांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत परिणामी त्यामुळे यावेळी होणारी पंचवार्षिक निवडणूक रंगतदार होणार असे चित्र सर्वत्र दिसत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचेही चर्चा होत आहे.