कोल्हापूर / प्रतिनिधी
राजाराम महाविद्यालयाच्या विस्तीर्ण माळावरील ऑक्सिजन पार्कला लागलेल्या आगीत तब्बल 300 हून अधिक झाडे नष्ट झाली. सोमवारी सायंकाळी आगीचा हा प्रकार घडला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, पण तो पर्यंत 300 झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. कुणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकारानंतर राजाराम कॉलेजच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, एकाचवेळी विविध प्रकारची झाडे एवढय़ा मोठय़ा संख्येने जळाल्याने पर्यावरणाचेही नुकसान झाले असून राजाराम कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राजाराम कॉलेज माजी विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये एकत्रित येऊन ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प सोडला. आपल्या कॉलेजचा माळ हिरवागार व्हावा, विविध प्रकारची झाडे लावून त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, पक्षांनाही घरटे उभारण्यासाठी वृक्षसंपदा असावी, या उद्देशाने ऑक्सिजन पार्कची उभारणी सुरू झाली. पहिल्या वर्षी 2018 मध्ये 500 , त्यानंतर 2019 मध्ये 300, 2020 मध्ये 130 आणि 2021 मध्ये 300 अशी एकूण 1230 झाडे लावण्यात आली. या झाडांना पाणी देण्यासाठी सिमेंटचे टँकही उभारले. आवश्यकतेनुसार टँकरने पाणी आणण्यासाठी आजी, माजी राजारामायीननी मदत घेण्यात आली. राजाराम कॉलेजचे प्रशासनही या कार्यात मदत करत असते. राजारामचे माजी विद्यार्थी वृक्षांचे जतन, संवर्धन आणि संगोपन करण्याचे काम करतात. दररोज सकाळी फिरण्यासाठी येणारे काही ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे ग्रुप झाडांना पाणी घालण्यासाठी मदत करत असतात. गेल्या चार वर्षांत लावलेल्या झाडांपैकी काही झाडे वाढली नाही, पण बहुतांश झाडांची चांगली वाढ सुरू होती. परिसर हिरवागार आणि शुद्ध ऑक्सिजन देणारा बनला होता. त्याचा लाभ फिरण्यासाठी येणाऱया नागरिकांबरोबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही होत होता.
सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ऑक्सिजन पार्कमधील झाडांना आग लागली. हा प्रकार एका विद्यार्थ्यांच्या निदर्शनास येताच त्याने माजी राजारामीयनना कळविला. अग्निशमन दल आणि पोलिसांनाही कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझवली. झाडांबरोबर असणाऱया गवताने वेगाने पेट घेतल्याने आग पसरली होती. ती आटोक्यात आणेपर्यंत अडीच तीन एक जागेतील तब्बल तीनशे झाडे जळून गेली. ऑक्सिजन पार्कचा परिसर पूर्णपणे भस्मसात झाला.
शासनाचे असणाऱ्या राजाराम कॉलेजचा परिसर तब्बल 62 एकरात व्यापला आहे. या ठिकाणी विविध शाखा विभागाच्या इमारती आहेत. तसेच इतरही शासकीय कार्यालये आहे. विस्तीर्ण माळही आहे. पण सुरक्षेसाठी आवश्यक त्या प्रमाणतत सुरक्षा रक्षक नाहीत, असे कॉलेज प्रशासनाने म्हणणे आहे. आग लागण्याचा प्रकार घडला. तेव्हा उपलब्ध असणारे सुरक्षा रक्षक काय करत होते? हा प्रश्नही या निमित्ताने पुढे आला आहे.
राजाराम कॉलेजच्या माळ आणि मैदानाच्या परिसरात सायंकाळी ओपन बार भरत असतो. यामध्ये परिसरातील मद्यपि व गुंडांचा भरणा असतो. त्यांना रोखणे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांना शक्य होत नाही. त्यामुळे कॉलेजच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे, हायमास्टसारखे मोठे दिवे लावणे आणि संरक्षक भिंत उभारणे हे उपाय आहेत. त्यासाठी शासनस्तरावर कॉलेज प्रशासनाच्या मदतीने पाठपुरावा करणार असल्याचे राजाराम कॉलेजचे माजी जनरल सेक्रेटरी शशिकांत पाटील यांनी सांगितले.
प्राचार्य सुनेत्रा महाराज यांनी जळालेल्या ऑक्सिजन पार्कची पाहणी केली. यावेळी प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. संजय पाठारे, माजी जनरल सेपेटरी दीपक जमेनीस, ऍड. सुनील धुमाळ यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नव्याने ऑक्सिजन पार्कची उभारणी आणि सुरक्षेवर चर्चा झाली. ऑक्सिजन पार्कला लागलेली आग हा दुर्दैवी प्रकार आहे. असे प्रकार टाळण्यासाठी यापुढे आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे
राजाराम महाविद्यालयच्या प्राचार्या सुनेत्रा महाराज यांनी सांगितले.