राजा भैय्या अन् अखिलेश यांच्यात वितुष्ट
कुंडा मतदारसंघ चर्चेत
वादांशी जुने नाते असलेले रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या कधीकाळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते, परंतु आता बदललेल्या राजकीय स्थितीत परस्परांवर टीकेचे बाण सोडत आहेत. यंदाच्या निवडणुकीत रघुराज प्रताप सिंह यांच्याविरोधात समाजवादी पक्षाने पहिल्यांदाच उमेदवार उभा केला आहे. गुलशन यादव यांना सपने उमेदवारी दिली असून स्वतः अखिलेश यादव यांनी तेथे सभा घेत यंदा जनता कुंडा मतदारसंघात कुंडी (कडी) लावून देणार असल्याचे म्हटले आहे. तर राजा भैय्या यांनीही प्रत्युत्तर देत कुंडामध्ये कुंडी लावण्यास सात जन्म लागणार असल्याचे सांगितले आहे. दोघांमधील वाप्युद्ध हे राजकीय गणितामुळे पेटले आहे.
राजा भैय्या 1993 पासून कुंडा येथून सातत्याने अपक्ष आमदार राहिले आहेत. भाजपच्या कल्याण सिंह, राजनाथ सिंह आणि समाजवादी पक्षाच्या सरकारांमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. अखिलेश यांच्या सरकारमध्ये राजा भैय्या हे खाद्य तसेच पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. पोलीस उपअधीक्षक जियाउल हक यांच्या हत्येप्रकरणी राजा भैय्या आणि त्यांच्या सहकाऱयांची नावे घेतली जात होती, परंतु त्यांच्याविरोधात कुठलीच कारवाई झाली नव्हती. याचा फटका समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांना बसला होता.
राज्यसभेकरता भाजपला मतदान
राजा भैय्या यांनी स्वतःच्या काही अपक्ष आमदारांसोबत मिळून राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता भाजपला मतदान केले होते. यामुळे अखिलेश यादव अत्यंत नाराज झाले आणि तेथूनच दोघांच्या संबंधांमध्ये दरी निर्माण होण्यास सुरुवात झाली. राजा भैय्या यांनी स्वतःचा राजकीय गोतावळा वाढविण्याच्या इच्छेपोटी जनसत्ता दल लोकतांत्रिक या पक्षाची स्थापना केली असून या पक्षाचे 17 उमेदवार उभे आहेत. यामुळे देखील सप आणि राजा भैय्या यांच्यातील राजकीय संघर्ष वाढणे स्वाभाविक आहे.
जातीय गणित चालत नाही
राजा भैय्यांचा राजकीय प्रवास बॉलिवूडच्या मसालापटापेक्षा कमी नाही. राजा भैय्यांच्या भागात लोक त्यांच्यानजीक खूर्चीवर देखली बसत नाहीत. किरकोळ प्रकरणांचे निवारण राजा भैय्या यांच्या पंचायतीतच होते. लोक पोलिसांपूर्वी राजा भैय्यांकडे फिर्याद घेऊन पोहोचतात. ही त्यांची लोकप्रियता आहे किंवा भीती, परंतु कुंडामध्ये आज देखील असेच घडते. कुंडामध्ये कुठल्याही प्रकारचे जातीय गणित काम करत नाही. बसपने 1997 मध्ये भाजपला दिलेले समर्थन मागे घेतल्यावर कल्याण सिंह सरकार कोसळणार होते, त्यावेळी राजा भैय्या यांनी बसप आणि काँग्रेसचे आमदार फोडून आणि काही अपक्ष आमदारांच्या मदतीने कल्याण सिंह सरकारला वाचविले होते.
राजा भैय्यांवर अनेक आरोप
कल्याण सिंह यांनी राजा भैय्या यांना स्वतःच्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले होते, परंतु तेथूनच राजा भैय्या आणि मायावती यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला. 2002 साली भाजप आमदार पूरन सिंह बुंदेला यांच्या तक्रारीवर राजा भैय्या यांच्या लखनौमधील घरी छापे पडले आणि तेथून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs हस्तगत झाल्याने मायावतींनी दहशतवादविरोधी अधिनियमाच्या अंतर्गत राजा भैय्या यांची तुरुंगात रवानगी केली होती. 600 एकरात फैलावलेल्या बेंती तलावाच्या खोदाईदरम्यान अनेक मानवी सांगाडे सापडले होते. मायावती या राजा भैय्यांना गुंडा म्हणून संबोधित करत होत्या.
1993 पासून आमदार
1993 पासून कुंडा मतदारसंघात अपक्ष आमदार म्हणून निवडून येत असलेले राजा भैय्या हे मुलायम सिंह यादव यांचे सरकार येताच तुरुंगातून बाहेर पडले. परंतु 2002 साली मायावती सत्तेवर आल्यावर त्यांनी राजा भैय्या यांच्या बेंती तलावाचे अधिग्रहण करत त्याला पक्षीविहाराचा दर्जा दिला. 2010 मध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसेदरम्यान एका उमेदवाराच्या मृत्यूच्या आरोपाखाली राजा यांना पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले होते.