श्रीलंकेसोबत मोठा तेल टँक करार – चीनला झटका
वृत्तसंस्था / कोलंबो
चीनच्या कर्जसापळय़ामुळे कंगाल श्रीलंकेने ड्रगनला मोठा झटका देत भारतासोबत त्रिंकोमाली तेल टँक करार केला आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे त्रिंकोमाली तेल टँक परिसराची निर्मिती करणार आहेत. सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण या कराराच्या अंतर्गत त्रिंको पेट्रोलियम टर्मिनल लिमिटेड, सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसोबत मिळून 61 तेल टँक विकसित करणार आहेत. भारताच्या तामिळनाडू राज्यापासून अत्यंत नजीक निर्माण होणाऱया तेल टँकचे सर्वप्रथम स्वप्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पाहिले होते.
श्रीलंकेच्या गोटाबाया राजपक्षे मंत्रिमंडळाने त्रिंकोमाली तेल टँक प्रकल्प भारतासोबत मिळून साकारण्यास मंजुरी दिली आहे. या सहकार्याबद्दल सर्वप्रथम 29 ऑक्टोबर 1987 रोजी झालेल्या भारत-श्रीलंका करारात उल्लेख करण्यात आला होता. या टँकला संयुक्तपणे दोन्ही देश विकसित करतील असे करारात म्हटले गेले होते. परंतु 35 वर्षे उलटून गेल्यावरही हा करार प्रलंबित राहिला. त्या काळात पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने यांच्यात पत्रांचे आदान-प्रदान देखील झाले होते.
अमेरिकेलाही स्वारस्य
श्रीलंकेत चाललेल्या गृहयुद्धामुळे हा करार सुमारे 15 वर्षांपर्यंत बाजूला पडला होता. 2002 मध्ये नॉर्वेच्या मध्यस्थीनंतर गृहयुद्ध समाप्त झाले. त्यानंतर श्रीलंकेच्या त्रिंकोमाली बंदरावर नौदलाचा तळ स्थापन करत अफगाणिस्तानात रसद पुरवठा करण्याची योजना अमेरिकेने आखली होती. याची कुणकुण लागताच भारतीय राजदूताने त्रिंकोमालीचा दौरा केला होता. तेथील तेल टँक दुसऱया महायुद्धापूर्वीचा असून तेथे 10 लाख टन कच्च्या तेलाचा साठा केला जाऊ शकतो.
श्रीलंकेत आर्थिक संकट
या तेल टँक साठय़ानजीकच त्रिंकोमाली बंदर आहे. त्रिंकोमाली हे चेन्नईच्या सर्वात नजीक असलेले बंदर आहे. चीन श्रीलंकेच्या या भागावर दीर्घकाळापासून नजर केंद्रीत करून आहे. आर्थिक आणि मानवी संकट तीव्र झालेले असताना श्रीलंकेने हा करार केला आहे. चीनच्या कर्जाच्या सापळय़ामुळे श्रीलंकेतील महागाई उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय तिजोरी वेगाने रिकामी होत असल्याने श्रीलंका चालू वर्षात दिवाळखोर होण्याची भीती व्यक्त होतेय.